प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -प्रत्येक कलेमध्ये विवेक जपला गेला पाहिजे. तसे झाले तरच ती कला उच्च कोटीची किमया साधू शकते. चित्रकार रवी परांजपे हे देखील आपल्या कलेच्या माध्यमातून विवेक जपणारे किमयागार असलेले चित्रकार होते, असे मत भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि चित्रकार रवी परांजपे यांना भारतीय संगीत प्रसारक मंडळातर्फे “स्वर श्रद्धांजली’ अर्पण करण्यात आली. यावेळी भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित प्रमोद मराठे उपस्थित होते.
जेव्हा कुंचल्याच्या माध्यमातून सृजनशक्तीचा अविष्कार होतो, तेव्हा चित्र जन्माला येते. असे चित्रकलेचे सुंदर अभिव्यक्ती रूप परमेश्वराने ज्यांच्या हातात दिले होते, ते परांजपे हे चित्रकलेचे किमयागार होते. वास्तववाद आणि सौंदर्यवाद या दोन्हीचा सुंदर मिलाफ आपल्याला परांजपे यांच्या चित्रांमध्ये दिसून येतो. परांजपे यांनी भारतीय संगीत प्रसारक मंडळात खूप मोठे काम केले. त्यांनी घालून दिलेल्या तत्वांवरच आज संस्था वाटचाल करत आहे, असे डॉ. देखणे म्हणाले.
यावेळी पं. मराठे यांनी परांजपे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. त्यानंतर स्वर श्रद्धांजली सभेत पं. सुहास व्यास यांचे शिष्य गायक केदार केळकर, सौरभ काडगावकर यांनी गायन सादर केले.