झुंबा नृत्यात अबालवृद्ध सहभागी
बारामती (प्रतिनिधी) – कुणी विटी दांडू खेळतोय, तर कोणी दोरीवरच्या उड्या मारतोय… कोणी रस्सीखेचमध्ये रस्सी ओढतोय तर कोणाच्या सूरपाट्यांचा खेळात रंगलाय.. कोणी टायर पळवतोय तर कोणी पोत्यातल्या उड्या मारण्याचा प्रयत्न करतोय, काही मुली महिला गजगे खेळताहेत, तर काही तळ्यात मळ्यातल्या खेळाचा आनंद
लुटत आहेत.
बारामतीच्या शारदा प्रांगणावर रविवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनीच विस्मृतीत चाललेल्या मातीतल्या खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. हे पारंपरिक खेळ खेळल्यानंतर झुंबा नृत्यात अबालवृद्ध सहभागी झाले. ही संकल्पना फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी “मातीतल्या खेळांच्या जत्रे’च्या माध्यमातून प्रत्यक्षात आणली. जत्रेचे यंदाचे चौथे वर्ष होते. शारदा प्रांगणात सकाळपासूनच बाळगोपाळांनी येत मातीतील खेळ खेळण्यास प्रारंभ केला होता. मुलांसोबत पालकच नाही तर आजी आजोबांनीही या खेळांचा आनंद घेतला. भोवरा, गोट्या, सूरपाट्या, तळ्यात मळ्यात, रस्सीखेच, विटी-दांडू, दोरीवरच्या उड्या, पोत्यातील उड्या, टायर पळविणे यांसारख्या खेळात सर्वच बारामतीकर उत्साहाने सहभागी झाले. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी या प्रसंगी जत्रेच्या आयोजनामागील पार्श्वभूमी विषद केली.
सर्वांचा उत्साह विचारात घेता वर्षातून एकदा ही जत्रा भरवून चालणार नाही, लोकांची मागणी विचारात घेता त्यात वाढ करावी लागेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे “ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाचे प्रवर्तक विनायक रानडे, निर्मात्या अश्विनी दरेकर, महेश भागवत, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, संभाजी होळकर, तत्ताड चित्रपटाचे निर्माते प्रीतम म्हेत्रे, कला दिग्दर्शक संदीप इनामके, कलाकार, प्रफुल्लकुमार कांबळे, डी. के. चेतन, किरण राजगुरु उपस्थित होते. काश्मिर ते कन्याकुमारी चार हजार कि. मी. सायकल प्रवास केलेल्या बारामती सायकल क्लबच्या आठ सदस्यांचा या वेळी सुनेत्रा पवार यांनी सत्कार केला.
“झुंबा’च्या तालावर धरला ठेका
मातीतल्या खेळांच्या जत्रेनंतर बारामतीकरांनी झुंबाच्या तालावर ठेका धरला. अनेक जण वय विसरुन आज या नृत्यात सहभागी झाले. या चार तासांच्या उपक्रमामुळे मनावरचा ताण ख-या अर्थाने हलका झाल्याची प्रतिक्रीया लोकांनी व्यक्त केली.