नवी दिल्ली – भारतीय संघात पदार्पण केल्यापासून कर्णधार म्हणून संघाचे सुकाणू हाती आल्यानंतरही विराटचा दृष्टिकोन कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने विराट कोहलीचे कौतुक केले आहे.
एकदिवसीय सामने तसेच टी-20 क्रिकेटमध्येही सातत्याने व्यस्त असूनही विराटचा कसोटी क्रिकेटबाबतचा दृष्टिकोन अन्य खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल. सामना कोणताही असे त्यात आपल्या क्षमतेपेक्षा जास्त सरस खेळ करण्याचा त्याचा प्रयत्नही खूपच प्रशंसनीय आहे. जेव्हा आमच्या दोघांत चर्चा होते त्यावेळी मर्यादित षटकांच्या सामन्यांपेक्षाही कसोटी क्रिकेटबाबत विषय चर्चिला जातो.
कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट असेच मत विराटचेही आहे. एकदिवसीय व टी-20 सामन्यातील कामगिरीला कमी समजत नाही. मात्र, कसोटी क्रिकेटमधील कामगिरी खेळाडूला जागतिक वर्चस्व प्राप्त करून देते असे विराट सांगतो तेव्हा त्याचे खरेच कौतुक वाटते, असेही द्रविड म्हणाला.
भारतीय संघ गेल्या तीन मोसमात एकदिवसीय व टी-20 सामने खेळला असला तरीही त्यापेक्षा कसोटी क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत विराटच्याच नेतृत्वाखाली संघाने अव्वल स्थान कायम राखले होते. यावरूनच विराटसह संपूर्ण भारतीय संघ कसोटी क्रिकेटचे गांभीर्यदेखील जाणतो याचे समाधान वाटते. कसोटीचा निकाल लागत नाही, सामने अनिर्णित राहतात त्यामुळे प्रेक्षक सहा-सात तासांचा सामना पाहण्यासाठी येतच नाहीत असे चित्र आज दिसते. मात्र, विराटसारखाच विचार प्रत्येक खेळाडूने केला तर कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वासही द्रविडने व्यक्त केला.
कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा पारंपरिक प्रकार आहे. दिवसेंदिवस एकदिवसीय सामन्यांपेक्षाही आज टी-20 सामने जास्त लोकप्रिय होताना दिसतात. कमी वेळेत संपणारे हे सामने प्रेक्षकांना जास्त पसंत पडतात हे मान्य पण तरीही विराटसारखे आजच्या काळातील खेळाडूदेखील कसोटी क्रिकेटचे महत्त्व जाणतात हे पाहिल्यावर कसोटी क्रिकेटचे वलय कायम राहील, असा विश्वास वाटतो, असेही द्रविडने स्पष्ट केले.