अमरावती जिल्हा द्वितीय क्रमाकांवर
मुंबई – देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात गरीब जनतेला रोजगार व उपजीविकेचे साधन मिळवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 1 एप्रिलपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अर्थात मनरेगाच्या वेतनात 20 रुपयांची वाढ केली आणि या मनरेगा अंतर्गत वेतनवाढीमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ मनरेगाच्या कामासाठी उपलब्ध झाले. महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामामध्ये भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर असून अमरावती जिल्हा द्वितीय क्रमाकांवर आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामीण भागात 28 मे पर्यंत लॉकडाऊन काळादरम्यान 1 लाख 23 हजार 307 जणांना रोजगार मिळाला. जिल्ह्यातील सुमारे 541 ग्रामपंचायतींचा सहभाग या कामामध्ये होता, अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असताना 28 मे पर्यंत 690 गावांतून 3 हजार 120 कामांच्या माध्यमातून 86 हजार 993 जणांना रोजगार मिळाला आहे. मनरेगा कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ग्रामीण भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून “मागेल त्याला काम’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील मेळघाटातील अतिदुर्गम परिसरात या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना या कामांची जाणीव व्हावी यासाठी खेड्यांमध्ये दवंडी देण्यात आली. मनरेगाची कामे मास्क, सॅनिटायझर्स आणि सामाजिक अंतर ठेवून केली जात आहेत. रोजगार हमीच्या कामांवरील मजुरीतही वाढ करण्यात आली आहे. प्रतिदिन 238 रुपये याप्रमाणे किमान मजुरी देण्यात येते आहे.