नॉटिंगहॅम -सलामीवीर लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांनी प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतरही पहिल्या डावात जबाबदारीने फलंदाजी करत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 278 धावांपर्यंत मजल मारुन देताना 95 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
गुरुवारच्या 4 बाद 125 धावांवरून शुक्रवारी पुढे खेळ सुरु झाल्यावर काहीवेळा पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ वारंवार थांबवण्यात आला होता. यष्टीरक्षक ऋषभ पंत अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर राहुलने जडेजाला साथीला घेत संघाचा डाव सावरला. अर्धशतकानंतरही राहुल संयमी खेळी करत होता तर जडेजाने खराब चेंडूंवर फटकेबाजी केली. जडजानेही दमदार अर्धशतकी खेळी केली.
या जोडीने सहाव्या गड्यासाठी 60 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली व संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. राहुल शतकाकडे कूच करत असतानाच 84 धावांवर बाद झाला. त्याने तब्बल 214 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार फटकावले. पाठोपाठ शार्दुल ठाकूरनेही निराशा केली.
त्यानंतर जडेजाही 86 चेंडूत 8 चौकार व 1 षटकार फटकावून 56 धावांवर बाद झाला. तळात महंमद शमी, जसप्रीत बुमराह व महंमद सिराज यांनी थोडीफार चमक दाखवली व संघाला अडीचशेपेक्षा जास्त धावा उभारून दिल्या. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सनने 5 तर जेम्स अँडरसनने 4 गडी बाद केले.