– अमित डोंगरे
आले नियतीच्या मना, तिथे कोणाचे चालेना असे म्हटले जाते. याचीच प्रचिती विराट कोहलीच्या गेल्या दीड वर्षांपासून पाहिलेल्या फलंदाजीवरून येत आहे. एकेकाळी पदार्पणापासून सचिन तेंडुलकरचा वारसदार अशी ओळख निर्माण केलेला हा गुणी फलंदाज आज धावांसाठी झगडताना दिसत आहे. कोहलीचा उल्लेख रनमशीन असा केला जातो आता त्यालाच गंज चढल्याचेही दिसून येत आहे.
कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 या क्रिकेटच्या तिनही प्रकारात जागतिक वर्चस्व मिळवलेल्या कोहलीला गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने अपयशचा सामना करावा लागत आहे. मागे एकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वीही असेच अपयश त्याला येत होते. त्यावेळी त्याने सचिनकडे सल्ला मागितला व फलंदाजी तसेच दृष्टिकोनातही काही बदल केले व कांगारूंच्या देशात धावांची रास निर्माण केली.
यंदा मात्र, त्याने इंग्लंडला जाण्यापूर्वी असे कोणाकडूनही मार्गदर्शन घेतले नाही. कारण त्यावेळी तो संघात नवीन होता व आज कर्णधार आहे. त्यामुळे इगो दुखावेल या भीतीपोटी त्याने विद्यार्थी दशा बाजूला ठेवली व आपणच भारतीय क्रिकेटचे कर्तेधर्ते आहोत हे दाखवायचा प्रयत्न केला.
जेव्हा खुद्द सचिनच्या धावा होत नव्हत्या तेव्हा त्याने सुनील गावसकर यांच्याकडून मार्गदर्शन घेत आपल्या फलंदाजीत तंत्रशुद्धताही आणली हेच कोहली का करु शकत नाही. केवळ सचिनचा वारसदार म्हणून ओळखला जाणे आणि प्रत्यक्ष मैदानावर सातत्याने मक्तेदारी निर्माण करणे यात फरक आहे. गेल्या दीड वर्षांत कोहली ज्या पद्धतीने बाद होत आहे त्याचा जास्त त्रास होत आहे. जागतिक दर्जाचा फलंदाज सातत्याने त्रिफळाबाद किंवा पायचीत होताना दिसत आहे.
गुरुवारी जेम्स अँडरसनच्या अफलातून स्विंगवर तो झेलबाद झाला. याला समालोचकांनी अनप्लेयेबल चेंडू असे म्हटले असले तरीही कोहलीसाठी तो कठीण निश्चितच नव्हता. पूर्वी भरात असताना तो याच चेंडूंवर स्क्वेअरकट किंवा स्क्वेअरड्राइव्ह मारत चौकार वसून करताना दिसायचा आता झगडताना दिसतो. याचे मुख्य कारण कोणी सांगू शकणार नाही पण आपण अंदाज बांधू शकतो.
एक म्हणजे कोहली सध्या सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहे. त्यातच ही मालिका सुरु होण्यापूर्वी त्याने अँडरसनला ट्रोल केले. तसेच त्याचे मैदानावरील वर्तन अत्यंत आक्रमक असल्याने कधी आपली योजना यशस्वी झाली नाही तर अकांडतांडव करण्याची त्याची सवय अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे त्याची मानसिकताही चिडचिड्या स्वभावाची बनत चालल्याचे उघडपणे दिसत आहे.
एकेकाळी संपूर्ण संघाची फलंदाजी आपल्या खांदावर उचलून धरणारा हा जागतिक दर्जाचा फलंदाज आज अपयशाच्या गर्तेतून जात आहे. टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा मारा इतका वाढला आहे की त्याचसमोर कसोटीत कशी फलंदाजी करावी याचाही गोंधळ फलंदाजांच्या मनात निर्माण झाल्यासारखे वाटते. पण कोहली त्याला अपवाद ठरेल असे वाटत होते पण अखेर तो देखील आता सामान्यच ठरत असून त्याचेच वाईट वाटते.
कसोटीत 7 हजारपेक्षा जास्त, एकदिवसीय सामन्यांत बारा हजारांपेक्षा जास्त व टी-20 मध्ये तीन हजारांपेक्षाही जास्त अशा जवळपास 22 हजारांपेक्षाही जास्त धावा करणारा हा फलंदाज एकेका धावेसाठी संघर्ष करताना दिसत आहे. लवकरात लवकर हे रनमशीन पूर्ववत धावताना दिसावे हीच अपेक्षा आहे.