नवी दिल्ली- रामनवमीच्या दिवशी देशाच्या काही भागात हिंसक घटना घडल्याच्या बातम्या आल्या आहेत. चार राज्यांमध्ये हे प्रकार घडले. त्या ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही ठिकाणी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल येथे हे प्रकार घडले.
मध्यप्रदेशातील खरगौन शहरात रामनवमीच्या मिरवणुकीवर करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर शहरात हिंसक घटना घडल्यामुळे तीन ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तेथे जमावाला आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला आहे. त्या शहरात सर्वत्र जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
गुजरातच्या आणंद जिल्हतील खंबात आणि सभरकांठा येथे हिंसक प्रकार घडले. तेथेही दगडफेक आणि जाळपोळ झाली. पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. खंबात येथील हिंसाचारात एक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तेथे काही दुकानांना आगी लावण्याचाही प्रकार घडला आहे.
पश्चिम बंगालच्या हावडाच्या शिवपुर भागात रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेकीचा प्रकार घडला. तेथे जादा बंदोबस्त तैनात करून स्थिती आटोक्यात आणण्यात आली. राम नवमीच्या उत्सवात सहभागी झालेल्यांवर पोलिसांकडून अत्याचार करण्यात आल्याचा आरोप सुवेंदु अधिकारी यांनी केला आहे. झारखंडच्या लोहारडगा भागातही हिंसाचार झाल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत.
हिंसाचार व द्वेष भावना टाळण्याचे राहुल गांधींचे आवाहन
देशाच्या विविध भागात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्व भारतीयांना न्यायप्रिय आणि सर्वसमावेशक भारत प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. द्वेष आणि हिंसाचार यामुळे देश कमकुवत होतो. त्यामुळे तो टाळून सामंजस्य आणि एकोपा निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गुजरातमधील हिम्मतनगर आणि खंभात शहरांमध्ये जातीय संघर्ष उफाळून आल्याच्या घटना काल घडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. रामनवमीच्या दिवशी मांसाहारी पदार्थ देण्यावरून जेएनयू कॅम्पसमध्ये हिंसाचार झाला होता त्याचीही पार्श्वभूमी त्यांच्या या संदेशामागे आहे.
त्यांनी म्हटले आहे की, द्वेष, हिंसा आणि दुजाभाव आपल्या प्रिय देशाला कमकुवत करत आहेत.या पार्श्वभूमीवर आपण बंधुता, शांतता आणि सौहार्दाच्या स्थितीचीच जोपासना केली पाहिजे. एक न्याय्य, सर्वसमावेशक भारत प्रस्थापित करण्यासाठी आपण एकत्र उभे राहूया असे आवाहनही राहुल गांधी यांनी ट्विटरवर केले आहे.