हैदराबाद – मोदी सरकारने तेलंगणातील तांदुळ उत्पादकांचा तांदुळ खरेदी करण्याच्या संबंधात 24 तासांत निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेऊ असा अल्टिमेटम मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. त्यांनी आज सरकारच्या तांदुळ खरेदीच्या निष्क्रीयतेबाबत मोदी सरकारवर तुफानी हल्ला चढवत त्यांना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की मोदी सरकारने कृषी माल खरेदीच्या संबंधातील आपले धोरण त्वरीत जाहीर करावे अन्यथा आम्हीं त्यांना सत्तेवरून हुसकाऊन लाऊ.
मी सरकारला खुले आव्हान देत आहे. मला अटक केली तरी बेहत्तर पण आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला सहज फेकून देण्या इतके आम्ही कमकुवत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या विरोधात काही बोलणाऱ्या नेत्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआय लावली जाते. आम्ही त्यांना भीत नाही असे आव्हानही त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी या संबंधात केलेल्या वक्तव्यांचाही त्यांनी जोरदार समाचार घेतला.
ते म्हणाले की पीयुष गोयल हे नासमज मंत्री आहेत. त्यांनी आमचे म्हणणे लक्षात घ्यावे अन्यथा असा जलवा आम्ही त्यांना दाखवून देऊ की त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागेल. सरकार शेतकऱ्यांवर सूड उगवत आहे. त्यांना किमान आधारभूत किंमत द्यायची नाही. म्हणूनच त्यांनी सरकारी खरेदी थांबवली आहे असा आरोपही चंद्रशेखर राव यांनी लावला आहे.