नाशिक: नाशिक शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक शासकीय आदेश धुडकावत विनाकारण शहरात फिरताना दिसत आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत.
यादरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक तसेच इतर नागरिकांवर आतापर्यंत तब्बल दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई गेल्या महिन्याभरातील आहे.
त्याशिवाय, शहरात विनामास्क सर्रासपणे फिरणाऱ्या 17 हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जर अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण फिरू नका, असे आवाहन वारंवार पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नाशिक शहरात सायंकाळी 7 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. मात्र, तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अशा 1400 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये बाहेर फिरणारे 900 तर मास्क न घालता फिरणाऱ्या 500 नागरिकांचा समावेश आहे. यांच्यावर 188 कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती.