डिंभे-भीमाशंकर (ता. आंबेगाव) येथील अभयारण्य अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास क्षेत्र करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत आहे. भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या कोंढवळ, निगडाळे, म्हातारबाचीवाडी, साकेरी, पाटण, आहुपे, पिंपरगणे या गावात झालेल्या बैठकीमध्ये अभयारण्यात अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास क्षेत्र करण्याबाबत सर्व ग्रामसभेतून विरोध करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.
हे क्षेत्र ज्या ठिकाणी घोषित होईल त्या ठिकाणी येणाऱ्या खासगी जमिनी, घरे संपादित करण्यात येऊन त्यांना मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येण्याची यामध्ये तरतूद करण्यात आली आहे, तसेच हे क्षेत्र सर्व गोष्टींसाठी निषिद्ध मानले जाणार आहे.
यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, जि. प. सदस्या रुपाली जगदाळे, पुणे जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, पिंपरगणे वनसमितीचे अध्यक्ष भिमा गवारी, सरपंच दीपक चिमटे, दत्ता लोहकरे, शांताराम लोहकरे, अशोक शेवाळे, ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
भीमाशंकर अभयारण्य 1985 साली घोषित करण्यात आले. त्यावेळी स्थानिक आदिवासी लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन स्थानिकांना त्याचा फायदा होईल, असे सांगण्यात आले.
अभयारण्यामुळे या ठिकाणचे रस्ते, तलाव पाणीपुरवठा योजना, शेती पूरक व्यवसाय आदी विकास कामे करण्यासाठी वनविभागाकडून मोठया प्रमाणात अडचणी निर्माण करण्यात आल्यामुळे मोठया प्रमाणात विकास कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वनहक्क मान्यता अधिनियम 2006 नियम 2008 सुधारित अधिनियम 2012या कायद्यानुसार अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याना मध्ये लोकांचे वैयक्तिक तसेच सामूहिक हक्क देण्याची तरतुद असताना भीमाशंकर अभयारण्यात 1972 च्या वन्यजीव कायद्याचा लोकांना धाक दाखवून जाणीवपूर्वक चाललेली कामे थांबवण्यात येत असल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले.
अतिसंवेदनशील क्षेत्र जाहीर करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी संदर्भ क्र. 3 अन्वये मार्गदर्शक सूचना विहित केल्या आहेत. सदर सूचनांच्या परिच्छेद 5.1 नुसार महसूल व वन विभागाने धोकाग्रस्त अदिवास निश्चित करण्यासाठी राज्यातील 55 ठिकाणच्या क्षेत्रासाठी तज्ज्ञ समित्या गठीत केल्या आहेत.
भीमाशंकर अभयारण्यासाठी श्रुती तांबे सामाजिक विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. पी. एस. भटनागर सायन्सटिस्ट डी प्रभारी अधिकारी व भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिम विभाग आकुर्डी, डॉ. जे. जयंती शास्त्रज्ञ बीएसआय यांनी नेमणूक केली आहे.
या समितीने अभयारण्य परिसरातील ज्या वनस्पती किंवा प्राणी या भागातील दुर्मीळ होत चालेले आहेत, त्यांच्या अधिवास या ठिकाणी आहे. त्यांच्या अधिवासाला या ठिकाणी राहणाऱ्या लोकांपासून धोका आहे किंवा ते एकत्र राहू शकतात यांची वैज्ञानिक निकषांवर छाननी करणे व ते ग्रामसभेत चर्चेसाठी ठेऊन मान्यता घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी लोकांचे वैयक्तिक दावे तसेच सामूहिक दावे यांना मान्यता देणे गरजेचेआहे. जो पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही व दिलेल्या निर्णयावरती लोकांचे समाधान होत नाही तो पर्यंत ही प्रक्रिया राबवता येत नाही.
- भीमाशंकर अभयारण्यात लोकांचे दावे प्रलंबित असताना ही समिती घोषित करणे चुकीचे आहे. या प्रक्रिया ताबडतोब थांबविल्या नाहीत किंवा लोकांना विश्वासात घेऊन वैयक्तीक व सामूहिक दाव्यांचे निर्णय न दिल्यास तसेच प्रलंबित विकास कामे चालू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- -संजय गवारी, सभापती, पंचायत समिती.