बाळासाहेब सोनवणे
राहता -सत्ता आणि राजकारणाच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन लोकांसाठीच अर्पण केले होते. पाणी, शिक्षण आणि आरोग्य या माध्यमातून गावांना आत्मनिर्भर करण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार समारंभ व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून संपन्न झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या व्हर्च्युअल रॅलीत सहभागी झाले होते. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. भारती पवार
खा. सदाशिव लोखंडे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. हरिभाऊ बागडे, आ. काशिराम पावरा, आ. बबनराव पाचपुते, आ. सुरेश धस, आ. मोनिकाताई राजळे, आ. आशुतोष काळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी आ. शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पोपटराव पवार, सुनंदा पवार, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, अनुराधा नागवडे यांच्यासह सर्व क्षेत्रांतील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विखे पाटील परिवाराच्या चार पिढ्यांच्या यशस्वी वाटचालीचा विशेष उल्लेख करुन, काही पिढ्या आपल्या कामातून सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पद्मश्रींनी सहकार चळवळ सुरू केली. या माध्यमातूनच पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण लोकांचे दुःख पाहिले. शेतकऱ्यांना सहकार चळवळीत जोडून ही चळवळ खऱ्या अर्थाने कुठल्या जातीची आणि धर्माची नाही, सहकार हा निपक्ष असतो, हाच संदेश दिला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
शेतीत कौशल्य असल्याशिवाय सुशिक्षित माणूसही शेती करू शकत नाही. याच विचाराने विखे पाटलांनी शेतीच्या संदर्भात मांडलेला विचार महत्त्वपूर्ण आहे. याच विचाराने आता शेतकऱ्यांना केंद्र सरकार सोयी सुविधा देवून उद्योजक बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, मोठे उत्पादन घेवून शेतकऱ्यांनी या देशाची भूक भागविली असली, तरी शेतकऱ्यांच्या नफ्यासाठी यापूर्वी कधी विचार झाला नाही.
परंतु आता मात्र या देशात प्रथमच शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार सुरू झाला आहे. शेती विषयक कायद्यांचा उल्लेख करुन पंतप्रधान म्हणाले, पीकविमा तसेच खंतांमधील अडचणी दूर करण्यासाठी सरकारचा सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकरी सन्मान योजनेतून आजपर्यंत 1 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. कोल्ड स्टोअरेज, मेगा फूड पार्कच्या उभारणीबरोबरच गावातील बाजारापासून ते मंडई पर्यंत शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, हाच विचार विखे पाटील यांनी आपल्या आत्मचरित्रातून मांडला होता. शेती ही निसर्गावर आधारित असावी, हे ज्ञान आज जतन करण्याचे वेळ आली आहे.
नव्या-जुन्यांचा मेळ घालण्याचे आवाहन त्यांनी केले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. विखे पाटील यांच्या आत्मचरित्रातील गोष्टींचा उल्लेख करत दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांचे प्रयत्न मोलाचे होते. त्याचे काम आता सुरू झाले असले, तरी आमच्या सरकारमध्ये या विषयीचे झालेले निर्णय विद्यमान सरकारने पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त केली. आ. चंद्रकांत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
जेष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांनी संपादीत केलेल्या मुलखा वेगळा माणूस या ग्रंथाचे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आभार मानले.
कोंडलेला हिरा कोंदणात बसविला : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विखे पाटील कुटुंबाशी असलेल्या ऋणानुबंधाचा भावनीकतेने उल्लेख करत शिवसेना प्रमुखांनी कोंडलेला हिरा कोंदणात बसविला, अशा शब्दांत डॉ. विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. मूर्ती छोटी असली, तरी त्यांची कीर्ती मोठी होती. विखे पाटील घराणे जिद्दीने परंतु परिस्थितीवर मात करत पुढे आले आहे. पक्षीय मतभेद विसरुन मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. जे करणे शक्य झाले नाही, ते करण्यासाठी भविष्यात काम करण्याचे सूचित करुन मोदीजींचा आशीर्वाद आहेच, असा आवर्जुन उल्लेख त्यांनी केला.