शेतमालाला बाजारपेठ आणि योग्य भावही मिळणार
पुणे – शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने नवीन योजना आणली आहे. “विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान राज्यात राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था अधिक बळकट होणार असून शेतकऱ्यांनी कोणत्या पिकांची लागवड करावी, बियाणे कोणते घ्यावे, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी, विक्री व्यवस्थापन आदींची माहिती कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शेतमालाला चांगला भाव मिळण्याची आशा आहे.
या उपक्रमांतर्गत शेतकरी अथवा शेतकरी गट ह्या व्यवस्थेद्वारे थेट ग्राहकांपर्यंत जोडण्यात येणार आहे. या अभियानाची जिल्हास्तरावर जबाबदारी प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तालुका कृषि अधिकारी यांनी पुरवठा साखली अविरतपणे कार्यरत ठेवण्यासाठी व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी या अभियानात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, तांत्रिक प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी यांच्या समवेत संवाद साधून स्टॉलची जागा निश्चित करावी. तसेच स्टॉल लावण्याचे तारखा व वेळापत्रक अंतिम करावे, जेणेकरून ग्राहकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद या अभियानास मिळेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.