नवी दिल्ली – जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जागतिक मोबाइल फोन बाजारात फक्त भारतात फोन विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या तिमाहीमध्ये भारतामध्ये गेल्या वर्षाच्या या तिमाहीच्या तुलनेत फोन विक्री 17 टक्क्यांनी वाढून 5 कोटी 43 लाख इतकी झाली आहे.
भारतातील ऑनलाईन फोन विक्रीत 48 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशनच्या आकडेवारीत म्हटले आहे. या तिमाहीत चीनमधील विक्री 14 टक्क्यांनी वाढली. अमेरिकेतील विक्री ही कमी झाली आहे.
भारतात स्मार्टफोन विक्रीत शिओमी पहिल्या क्रमांकावर असून या कंपनीचे 13.5 दशलक्ष फोन विकले गेले. दुसऱ्या क्रमांकावरील सॅमसंगची विक्री 38 टक्क्यांनी वाढून 12.1 दशलक्ष एवढी झाली आहे. आता सॅमसंग कंपनीची भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरली आहे.
या अगोदर अमेरिका सॅमसंगची सर्वात मोठी बाजारपेठ होती. सॅमसंगच्या ऑनलाईन विक्रीत 43 टक्के वाढ झाली आहे. या कंपनीचे गॅलक्सी एम के 20 व एम 31 हे फोन भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय आहेत.