धर्मशाला – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडीजपाठोपाठ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आज (शनिवार, सांयकाळी 7 वा.) या दोन संघात होत असलेला दुसरा टी-20 सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे.
या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 62 धावांनी विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना जिंकत मालिकाही तिसऱ्या सामन्यापूर्वीच खिशात टाकण्यासाठी रोहित आणि कंपनी सज्ज बनली आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी वादळी फलंदाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या.
आता श्रीलंकेच्या गोलंदाजांना या मालिकेत प्रतिष्ठा जपायची असेल तर भारताच्या बलाढ्य फलंदाजीवर दडपण राखावे लागेल. वनिंदू हसरंगा याच्या अनुपस्थितीत त्यांची गोलंदाजी दुबळी बनली असून उपलब्ध गोलंदाजांमध्येही लाहिरु कुमारा, दासुन शनाका यांच्यासह अन्य गोलंदाजांनी निराशा केली आहे. अर्थात याच क्षेत्रात भारतीय गोलंदाजही फारसे यशस्वी ठरलेले नाहीत.
भूवनेश्वर कुमार वगळता अन्य सर्व गोलंदाजांना धावांवर अंकूश ठेवता आला नाही. आता हा दुसरा सामना धर्मशालाच्या मैदानावर होत असल्याने वातावरणातील गारव्याचा लाभ सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना होणार आहे. दोन्ही संघांचे बलाबल पाहता भारताच्या गोलंदाजांना विशेषतः भुवनेश्वरची स्विंग गोलंदाजी श्रीलंकेसाठी डोकेदुखी ठरू शकते.