महाराजागंज, (उत्तर प्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने भारत नेपाळ सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. सशस्त्र सीमा बल आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून नेपाळ सीमेवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अयोध्येत श्रीराम विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी ३० डिसेंबर रोजी अयोध्येत येणार आहेत. तसेच पुढील महिन्यात २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभुमीवर भारत आणि नेपाळ दरम्यानच्या सीमेवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
समाजकंटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमेवरून येणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्याच्या सूचना सीमेवरील सुरक्षा यंत्रणेला देण्यात आल्या आहेत, असे गोरखपूरचे सशस्त्र सीमा बलचे उपमहानिरीक्षक अखिलेश्वर सिंग साइड यांनी सांगितले. एसएसबीच्या चौक्यांवर कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच श्वान पथकेही तैनात ठेवली गेली आहेत. सुरक्षा रक्षक महिलांची एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे.