नवी दिल्ली – देशात नुकत्यात पार पडलेल्या पाच राज्यांपैकी तीन राज्यांचा निकाल अनपेक्षित लागला, ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना अडचणी आहेत, असे अजिबात होत नाही. आज इंडिया आघाडीत आम्ही जे एकत्र आहोत, त्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी खबरदारी घेण्याची आमची तयारी आहे. त्या कामास आम्ही सुरुवात केली आहे.
त्यामुळे आगामी काळात एकत्र लढल्यास आम्हाला यश नक्कीच मिळेल. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीसोबत यावं ही सर्वांचीच इच्छा आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, असेही शरद पवार म्हणाले.
अमरावती येथे ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार म्हणाले, राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नाही. राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा तिथे केवळ एकच पक्ष होता. एकच नेता सांगत होता ‘बाबरी आम्ही पाडली’ ते बाळासाहेब ठाकरे होते. बाकी कुणी म्हटलं नव्हतं, बाबरी आम्ही पाडली म्हणून, त्यामुळे जो काही संघर्ष होता त्यामध्ये शिवसेनेची भूमिका होती की नाही, याबद्दल वाद घालण्यात काही अर्थ नाही.
शिवसेनेची भूमिका होती हे आम्ही स्वत: बाळासाहेबांच्या वक्तव्यांमधून ऐकलं होतं. बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली, असं वक्तव्य करत शरद पवार यांनी भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच सत्ताधारी भाजपा राम मंदिराच्या नावावरून राजकारण करत आहे की व्यवसाय हे मला माहित नाही, असे उत्तरही त्यांनी एका प्रश्नाला दिले.