-अरुण गोखले
ॐ नमोजि आद्या ह्या स्तवनातच श्री गणेश हेच त्या परब्रह्माचे मूळ ओंकारस्वरूप असून हा देव सकल विघ्नांचा नाश करणारा, ज्ञान कला बुद्धी देणारा, सर्वांचे मंगल करणारा असा मंगलमूर्ती आहे, असे सांगितले आहे.
भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीस मातीचा गणपती करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापूर्वक पूजन करावे, असे श्री गणेश पुराणात सांगितलेले आहे. पार्वतीने आपल्यावर त्या ओंकारस्वरूप परब्रह्माची कृपा व्हावी म्हणून ओंकाराची उपासना केली. तिच्या त्या कठोर उपासनेचे फलित आणि तिची मनोकामना याचे फलित म्हणूनच की काय तिच्या अंगातील शक्ती ही एका बालकाचे रूप घेऊन तिच्या समोर प्रकट झाली. तोच पार्वतीचा नंदन श्री गणेश.
एक दिवस पार्वती ह्या आपल्या पुत्रास द्वाररक्षणाच्या कामावर बसवून स्नानास गेली. कोणासही आत प्रवेश करू देऊ नकोस, असे त्यास बजावले. त्याप्रमाणे त्याने अचानक तिथे आलेल्या शिवशंकरालाही अटकाव केला. एका छोट्या बालकाने आपल्याला आपल्याच घरात प्रवेश करण्यास अडवावे ह्याचा शंकराला राग आला. त्याने त्या बालकास सांगून, समजावून पाहिले.
पण त्या आज्ञाधारक पुत्राने मातेच्या शब्दाप्रमाणे त्यांना विरोध केला. तेव्हा क्रोधीत झालेल्या शंकराने त्रिशुळाने त्याचे शीर उडविले. बाळाची आर्त हाक ऐकून पार्वती बाहेर आली. तिने तो प्रकार पाहिला. तिने शंकरांना बालगणेश हा आपलाच पुत्र असल्याचे सांगितले आणि त्यास जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा शंकरांनी शिवगणांकडून एक गजमुख आणून ते बालकास बसविले आणि गणेशाचा गजानन झाला ही कथा तर आपल्या सर्वांना चांगलीच माहीत आहे.
या कलियुगामध्ये सर्व लोकांची अत्यंत आवडती आणि प्रिय अशी जर कोणती देवता असेल तर ती म्हणजे श्रीगणेश. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीस ज्यांच्या त्यांच्या कुळधर्म कुलाचाराप्रमाणे घरोघरी गणेशाच्या मूर्ती आणून त्यांचे दीड, पाच, सात किंवा दहा दिवस भक्तिभावाने पूजन अर्चन केले जाते. या दिवसातील घरोघरचे वातावरण हे मोठ्या आनंद आणि उत्साहाचे असते.
घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने या उत्सवाच्या सादरीकरणात आपला सक्रिय वाटा मोठ्या आनंदाने उचलीत असतो. या गणेश उत्सवास लो. टिळक ह्यांनी सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले. हा दहा दिवसांचा उत्सव म्हणजे अनेक कलावंत, व्यावसायिक, सामाजिक लोकोपयोगी उपक्रम आयोजक ह्यांना एक सुसंधीच असते. या उत्सवाच्या निमित्ताने घडून येणारी आर्थिक उलाढालसुद्धा मोठ्या प्रमाणावर असते.