श्रीकांत कात्रे
सुरळीत चाललेल्या आयुष्याला काही तरी संकटांमुळे कलाटणी मिळते. अशा वेळी अनेक जण डगमगून जातात. पण विद्या कासकर यांनी मोठ्या हिमतीने स्वतःला सावरत वेगळा व्यवसाय करायचे निश्चित केले. सुरवातीला संघर्ष करावा लागला. नंतर जम बसला. व्यवसायातून आर्थिक स्थिरता मिळत गेली. त्यावेळी त्यांनी इतरांनाही रोजगार मिळवून देण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी काही मूकबधीर मुलींना प्रोत्साहन दिले. त्यांनीही त्याला प्रतिसाद देत संधीचे सोने केले. संवेदनशील विद्या यांनी स्वतः स्थिर होत इतरांसाठी केलेले हे प्रयत्न केवळ वेगळेच आहेत…
प्रत्येकाच्या आयुष्यात काही वेळा खडतर प्रसंग येतात. त्यावेळी सकारात्मक भूमिका घेत काही मार्ग काढावा लागतो. सातारा शहरातील विद्या कासकर यांना अचानक झालेल्या बदलांमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परिस्थितीशी झगडत त्यांनी हिमतीने मार्ग शोधला. विद्या यांचे माहेर अंगापूर (ता. सातारा). विद्या यांनी बी. फार्म. चे शिक्षण पूर्ण करून साताऱ्यात 1999 मध्ये औषधांचे दुकान व लेडिज शॉपी सुरू केली. सारे सुरळीत सुरू असताना अचानक 2014 मध्ये काही कारणास्तव त्यांना औषध दुकान व लेडिज शॉपी बंद करावी लागली.
रोज काही उद्योगात असणाऱ्या विद्या यांना घरी थांबावे लागले. घरी बसून काय करायचे या विचारातून त्यांनी मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरु केले. हस्तकलेतून ज्वेलरी तयार करण्याची आवड त्यांना होती. त्यामुळे हॅंन्डमेड ज्वेलरी करण्याचे त्यांनी ठरविले. क्विलिंग पेपर, क्रिस्टलचे दगिने तयार करणे सुरू झाले. हळूहळू व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. नंतर नवनवीन कल्पनांनी विविध प्रकारचे दागिने तयार करणे त्यांनी सुरु केले. व्यवसायाने 2017-18 पासून एकदम ग्रीप घेतली. तोपर्यंत त्या हे काम एकट्याने करत होत्या. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेची मुलगी मूकबधीर होती. तिची शाळा बंद पडली होती. विद्या यांनी या मुलीला हे काम शिकवले. हळूहळू ती दागिने तयार करून लागली.
नंतर तिच्या शाळेतील इतर काही मुलींही या काम शिकल्या. या मुलींशिवाय आणखी एक गरजू महिलेलाही त्यांनी काम दिले. पाच ते सहा जणी मिळून काम करू लागल्या. मार्केटमध्ये सध्या खणाच्या ज्वेलरीचा ट्रेंड आहे. त्याशिवाय क्रिस्टल, फॅब्रिक, गोल्डन मणी अशा कच्च्या मालातून दागिने तयार होऊ लागले. पारंपरिक दागिन्यांपेक्षाही विद्या यांचा कल वेस्टर्न पद्धतीचे दागिने करण्याकडे आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील विविध प्रदर्शनातून त्यांच्या हस्तकलेतून साकारणाऱ्या दागिन्यांचे स्टॉल दिसू लागले. त्याला प्रतिसाद मिळू लागला.
कपड्यांच्या रंगांनुसार त्या लगेचच दागिने तयार करून देतात. महाराष्ट्रातील काही ठिकाणांसह हुबळीपर्यंत व परदेशातही त्यांचे दागिने जातात. त्यांचे दागिने पाहून माणदेशी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला. मुंबईला नुकत्याच झालेल्या माणदेशी महोत्सवात त्यांचा स्टॉल लावण्यात आला. माणदेशीमुळे मार्केटमध्ये खरी ओळख निर्माण करून झाली, या महोत्सवाच्या चारच दिवसांत त्यांना पावणेतीन लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले, असे त्यांनी सागितले. व्यवसाय सुरू केला त्यावेळी त्यांना सात हजार रुपयांचा कच्चा माल लागला होता.
आता त्यांना तीन ते चार लाखांचा कच्चा माल लागतो. कच्चा माल आणण्यासाठी त्या मुंबई व अहमदाबाद येथे जातात. काही वेळा किरकोळ माल लागणार असेल तर त्या ऑनलाइन मागवतात. क्रिस्टल, सीड बीड (छोटे मणी), ऍन्टिक, पेन्डन्ट, थ्रेड अशा मालातून सगळ्या प्रकारचे दागिने बनविले जातात. पुरूषांसाठी ब्रेसलेटही तयार होते. राजवर्खी, रुद्राक्ष माळही तयार केली जाते.
मात्र, सध्या खणांच्या दागिन्यांचा ट्रेंड असल्याने त्यावर भर दिला जातो. मार्केटिंगसाठी यू ट्यूबसारख्या डीजिटल माध्यमांचाही त्या उपयोग करतात. कोविड काळात काही काळ व्यवसाय बंद राहिला. मात्र, आता हा व्यवसाय जोमाने सुरू आहे. मागणी लक्षात घेऊन यापुढील काळात त्यांना व्यवसाय अधिक वाढवायचा आहे. पण आता मुलगा शिकून तोही कमवू लागला आहे. केवळ पैसे मिळावेत म्हणून व्यवसाय वाढवायचा नाही, तर समाजातील अशा मूकबधीर मुलींना चार पैसे उपलब्ध करून देता आले पाहिजेत, यासाठी व्यवसाय वाढविणार असल्याचे त्या सांगतात. अडचणीच्या काळातून संघर्ष करीत बाहेर पडल्यावर स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणे सोपे नसते. पण विद्या यांनी तो केला. मेहनतीतून व्यवसायाला दिशा दिली. एखादी महिला स्वतः कष्ट करून स्वावलंबी होते. त्याशिवाय ती इतरांनाही मदत करण्याची भूमिका घेते ही गोष्ट नक्कीच आदर्शवत अशी आहे.