देशाच्या भल्यासाठी आपले घरदार-आराम, सुख-सुविधा यांच्यावर तिलांजली वाहणारी अनेक मंडळी ज्या देशाने पाहिली, त्या देशात आता केवळ कोणाचा भ्रष्टाचार मोठा आणि कोणती राजवट जास्त दडपशाहीखोर याच्या जाहीर चर्चा होतात त्यात कोणाला खेद वाटत नाही.
मोदी आडनाव बदनाम प्रकरणात कॉंग्रेस नेते राहुल गांधींना शिक्षा झाली. त्यांची खासदारकीही गेली. वरच्या न्यायालयात विषय मार्गी लागेल ते बघायचंय. दोषी ठरविल्यानंतर राहुल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. यापुढेही तेच करत राहणार, आपण कोणाच्या विरोधात बोललो नव्हतो, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर समाजमाध्यमावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची. माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा देव आहे आणि अहिंसा हे ते मिळवण्याचे साधन आहे, असेही त्यांनी म्हटले. या ओळी महात्मा गांधी यांच्या आहेत. त्या राहुल यांनी पुन्हा सांगितल्या आहेत.
राहुल यांना गांधीजींच्या या विधानाचे स्मरण आहे ही चांगली बाब आहे. मात्र, आजच्या एकूण राजकीय व्यवस्थेला त्याचे किंवा प्रत्यक्ष महात्मा गांधी यांचे स्मरण आहे का, हा खरा मुद्दा आहे. त्या अर्थाने विचार करू पाहता आपल्याला गांधीजींचे विस्मरणच झाल्याचे वास्तव समोर येते. ते आताच झालेले नाही. त्याला आता पाच दशके झाली आहेत.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या दशकात गांधीजींचे अनुयायी असणाऱ्या एका नेत्याने संसदेत तत्कालीन सरकारवर टीका केली होती. सरकार गांधीजींना आदर्श मानणारे होते. तरीही अनुयायाने केलेली टीका काहींना रूचली नाही. तुम्ही विरोधी पक्षात कधी गेलात, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, जेव्हा गांधीजींचे नाव घेत त्यांचेच विचार चिरडण्याचा प्रकार सुरू झाला आहे, गांधीजींची प्रशंसा करत कमिशन आणि करप्शन या दोन्हींसाठी दारे खुली करण्यात आली आहेत तेव्हाच मी तुमच्या विरोधात गेलो, अशा आशयाची टिप्पणी त्यांनी तेव्हा केली होती.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा सुरुवातीचा तो काळ चैतन्यमय होता. लोक भारावलेले होते. प्रत्येकाच्या मनात काही स्वप्ने होती. हा देश आपला आहे आणि आपण त्याला उत्तरदायी आहोत अशी सार्वत्रिक भावना होती. त्या काळात प्रगतीची शिखरे खुणावत होती. अनेक मर्यादा होत्या. साधनसामग्रीचा अभाव होता. पण जिद्द होती. दुर्दम्य इच्छाशक्ती होती. वाट्टेल ते करून आपले लक्ष्य साध्य करण्याचा आशावाद होता. प्रगती होत गेली. अजूनही होते आहे. दरम्यानच्या काळात आपण बरेच काही गमावतही गेलो. जे आपले होते, चांगले होते ते हातातून निसटत गेले. साधनापेक्षा साध्य महत्त्वाचे ठरू लागले.
मला जे पाहिजे ते मी मिळवणार, त्याकरता मला कोणताही मार्ग वर्ज्य नाही हा विचार प्रबळ झाला आणि पाहता पाहता भारत एका चक्रव्युहात अडकला आहे का, असा प्रश्न स्वत:ला विचारावा अशा स्थितीपर्यंत देश येऊन पोहोचला. हे चक्रव्यूह पूर्ण ज्ञानाच्या अभावाचे आहे. काही अंधानुकरणाचे आहे, काही सदवर्तनाला दिलेल्या तिलांजलीचे आहे. काही स्वार्थाचे आणि दुसऱ्याचे ओरबाडण्याचे आहे. हे सगळे आपण करू शकतो, मात्र त्यातून बाहेर जाता येत नाही. त्यातच गुरफटत राहतो आणि पुन्हा कोणीतरी येऊन हे सगळे आपल्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो.
आपण स्वीकारलेली राज्यपद्धती, आपले प्रतिनिधित्व करणारी ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वे, त्यांचा कथित बडेजाव आणि त्यातूनही उठून दिसणारा खुजेपणा, संकुचितपणा, विरोधकाचा कायमचा बीमोड करण्याची लालसा हे सगळे आपण पाहात आहोत. आपल्या भारतात हे घडते आहे. कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोणाकडे बेहिशेबी मालमत्ता आहे. चोरी पकडली जाऊ नये म्हणून नोटा फेकल्या, जाळल्या जात आहेत. कोणावर विनयभंगाचा तर थेट बलात्काराचा आरोप आहे. हत्येचे आरोपही अनेक जणांवर आहेत. पुन्हा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत ही सगळी मंडळी निर्दोष आहेत. परस्परांवर खटले दाखल केले जात आहेत. कोणाच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा आहे. त्यात कोणाला तरी राजकीय हेतू दिसतो आहे. तपास यंत्रणा मागे लावणाराही राजकीय हेतूनेच हे सगळे करतो आहे, हा कोणत्या दिशेने आपण प्रवास सुरू केला होता आणि कुठपर्यंत आपण आज पोहोचलो आहोत हे स्वत:ला पुन्हा विचारायला लावणारे आहे.
भारतावर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांनी रणनीती तयार केली होती. आपली भाषा, संस्कृती, इतिहास यापासून आपल्याला दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात त्यांना त्यांचा हेतू साधायचा होता. आपला आत्मविश्वास डळमळीत करायचा होता. त्यात ते बहुतांशी यशस्वीही झाले. भारतातून जाताना ते एका विशिष्ट शिकलेल्या वर्गाकडे कारभार सोपवून गेले. हा वर्ग स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे मानत होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जी बिजे पेरली गेली त्याचे आता वृक्ष झाले आहेत. प्रगत म्हणून, आधुनिक म्हणून आणि श्रेष्ठ म्हणून पाश्चिमात्य देशांकडे पाहण्याची सवय जी आपल्याला लागली ती तेव्हाचीच. गांधीजींना याची कल्पना होती. त्यांनी एका वेगळ्या समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले होते. परदेशातून शिकून आल्यावर टाय घालून फिरणारा हा समृद्ध भारतीय त्यांना अपेक्षित नव्हता. ग्रामीण भागातून अगदी शेवटच्या घटकापासून विकसित होत गेलेला भारतीय त्यांना अपेक्षित होता.
ग्रामराज्याची त्यांची कल्पना होती. त्यात शासन व्यवस्था दिल्लीपासून खेड्यापर्यंत नाही तर पंचायतीपासून संसदेपर्यंत असे त्यांना अभिप्रेत होते. ज्या नीतीमूल्यांवर त्यांचा विश्वास होता ती मूल्ये त्यांनी प्रामाणिकपणे मांडली व त्यांचा स्वीकार करणारी पिढीही तयार केली. गांधीजींच्या विचारांना आणि मूल्यांना मानणारा हा वर्ग त्या मूल्यांच्या जोपासनेत स्वत: गांधींपेक्षा काकणभर पुढेच होता. तथापि, बाहेरची चमक, तिकडचे अनुकरण त्यातून आपल्या संस्कृती आणि देशाबद्दल निर्माण झालेला न्यूनभाव यामुळे चित्र वेगात बदलत गेले. हे या लोकांना पाहावे लागले. आज शिक्षण आणि प्रगती म्हणजे अमेरिकेकडे अथवा त्यासम प्रगत देशाकडे जाणे हा पायंडा झाला. जे सुस्थितीत आहेत त्यांना आपल्याच देशात भय वाटते आहे. सर्व सुविधा आणि ऐश्वर्य असतानाही त्यांचे स्थलांतर सुरू आहे. त्याचेही आकडे अलीकडेच सांगितले गेले.
जे अन्य क्षेत्रात तेच राजकीय क्षेत्रातही. राजकारण आता करिअर झाले आहे. त्यामागे पैसा, प्रसिद्धी, डामडौल, प्रतिष्ठा हा विचार असतोच. निवडून येणे, सत्ता प्राप्त करणे आणि त्याकरता कशालाही तिलांजली देणे यात आता वैषम्य वाटेनासे झाले आहे. लोकप्रतिनिधींना लोकसेवक म्हणण्याचा काळ होता. आता स्वार्थसेवकांचा काळ आहे. सगळेच स्वार्थसेवक नाहीत, मात्र लोकसेवक आणि स्वार्थसेवकांमधील सीमारेषा नक्कीच पुसट झाली आहे. सरकारी छत्री डोक्यावर न घेता चांगले काम करणारी असंख्य माणसे अवतीभोवती आहेत. पण ती एकसंध नाहीत तर विखुरलेली आहेत. त्यांचा एकत्रित आवाज उमटत नाही. जो प्रत्येकाचा स्वत:चा आवाज असतो तो अत्यंत क्षीण असतो आणि आजूबाजूच्या कोलाहलात तो दबलाही जातो. लोकप्रतिनिधीने पराकोटीचे विनम्र असावे, असे गांधीजींना किंवा आदर्श राजकारणात अपेक्षित असते. त्याच्या विनम्रतेनेच त्याने नागरिकांच्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्याही मनात स्थान निर्माण करायला हवे. आज विनम्रतेची जागा श्रेष्ठत्वाने घेतली आहे.
हे श्रेष्ठत्व गुणांचे किंवा मूल्यांच्या जपणुकीमुळे आलेले नाही तर ते दुसऱ्याचे दमन करू शकणारी आर्थिक अथवा अन्य ताकदीमुळे आलेले आहे. जनसेवेच्या नावाखाली धनदांडग्यांचा एक नवा वर्ग प्रस्थापित झाला आहे. हा वर्ग आपल्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती स्वत:च करतो आणि त्याला प्रस्थापितही करतो. तोपर्यंत तो त्याच्या अनुयायांना अर्थात आश्रितांना राबवत असतो आणि नागरिकांची दिशाभूल करत असतो. मूठभर वर्गाची श्रीमंती आणि संपन्नता यालाच हा दिशाभूल झालेला वर्ग आपली श्रीमंती आणि वैभव मानू लागतो. देशाच्या भल्यासाठी आपले घरदार-आराम, सुख-सुविधा यांच्यावर तिलांजली वाहणारी अनेक मंडळी ज्या देशाने पाहिली, त्या देशात आता केवळ कोणाचा भ्रष्टाचार मोठा आणि कोणती राजवट जास्त दडपशाहीखोर याच्या जाहीर चर्चा होतात त्यात कोणाला खेद वाटत नाही.
भारताला विकास हवा आहे. त्याला विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग अशा सगळ्याच क्षेत्रांत प्रगती हवी आहे. त्यासाठी कोणाचा अभ्यास करून आपल्या चुकांची दुरुस्ती करण्यात गैर काही नाही. पण हे सगळे करत असताना आपला मूळ हेतू काय आहे, साधायचे काय आहे आणि त्यासाठी साधन कोणते असायला हवे याचाही विचार आवश्यक आहे. अर्धवट माहितीच्या आधारे कशात उतरायचे आणि सगळेच अर्धवट करत राहायचे किंवा स्वत:चा विचार सोडून आयात केलेल्या विचारायला कवटाळत राहायचे अशाने हा चक्रव्यूह भेदला जाणार नाही, भेदता येणार नाही.
– माधव सरदेसाई