मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निकालानुसार आधी, अधिकृत पक्ष कोणता आणि पक्षप्रमुख कोण हे ठरवावे लागणार आहे, त्यानंतरच प्रतोताची नियुक्ती आणि आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली निघेल, असे मत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते माध्यमंशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती किंवा मान्यता ही रद्द ठरवली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे मत व्यक्त केला आहे.
नार्वेकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने गोगावले यांची नियुक्ती करताना केवळ विधिमंडळ पक्षाच्या प्रमुखांनी त्यांची नियुक्ती केली, या एका कारणामुळे नियुक्तीला मान्यता देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर सुप्रीम कोर्टाने अधिकृत शिवसेना पक्ष आणि तत्कालीन पक्षप्रमुख याचा निर्णय आधी घ्यावा, असे मत व्यक्त केले आहे.’
राहुल नार्वेकर सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता याबाबतचा निर्णय राहुल नार्वेकर यांनाच घ्यावा लागणार आहे.