सांगली – राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला. याचा सर्वाधिक फटका सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणाला बसला आहे. संततधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. अनेक गावांना पुराने वेढा दिला होता. आता काही प्रमाणात पूर ओसरला आहे. मात्र पुरानंतर आता येथील नागरिकांसमोर दुसरच संकट उभं राहिल आहे.
अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. या पुरात जीव जंतू वाहून आले. कृष्णा नदीत मगरींचा वावर असतो. मात्र पुरानंतर या मगरींनी मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. सांगलीतील एका रस्त्यावर मगर दिसून आली आहे. जिल्ह्याच्या वाळवा परिसरातील लक्ष्मी नगर भागात रस्त्यावर मगर फिरताना स्थानिक नागरिकांना आढळली आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मगर रस्त्यावरून फिरत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कृष्णा नदीला पूर आल्यापासून अनेक मगरी नदीच्या बाहेर आल्याचे नागरिकांचे म्हणणं आहे.
याआधी २०१९ मध्ये कृष्णा नदीला पूर आला होता. त्यावेळी देखील मगरी मानवी वस्तीत आढळून आल्या होत्या. आता देखील तसच झाल्याचं सांगण्यात येत आहे.