भिवंडी : राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहत असून, उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्वच पक्षानी कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या जाहीर सभेचं भिवंडी मध्ये आयोजन करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांच्या सभेतील ठळक मुद्दे
- सगळेच सत्तेसाठी धावत आहेत पण राज्यात सक्षम विरोधी पक्ष नसेल तर वाट्टेल तसे वागतात आणि लोकांना चिरडतात.. आजची परिस्थिती अशी आहे की सरकारने झोडलं आणि पाऊसाने झोडलं तर तक्रार कोणाकडे करायची. सरकारने झोडलं तर तक्रार करायला सक्षम विरोधी पक्ष हवा
- गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण त्याचा आम्हाला राग येत नाही, निवडणुका म्हणजे फक्त धमाल अशी परिस्थिती आहे
- ९८२ ला भिवंडीत मी पहिल्यांदा सन्मानीय बाळासाहेबांबरोबर आलो होतो आणि पुढे अनेकवेळा आलो. पण आज येताना खड्डे बघून प्रश्न पडला की तुम्हाला राग कसा येत नाही, मला असल्या हतबल लोकांचं नेतृत्व करायला आवडत नाही.
- भिवंडी मधील विजेचा प्रश्न, टोरेंट नावाची कंपनी गुजरात मधून आली, आणि तिने लुटायला सुरुवात केली आहे. भिवंडीकरांनी भाषणांना टाळ्या द्यायच्या ऐवजी ती एक टाळी टोरेंटच्या अधिकाऱ्याच्या गालावर मारली तर परिस्थिती सुधारेल
- शिवसेनेचे खासदार सिटी कॉऑपरेटिव्ह बँक चालवत आहेत, आणि बँक बुडल्यावर खातेदार भगिनी त्या शिवसेनेच्या खासदारांना भेटायला गेले तर म्हणाले मी काही करू शकत नाही, मरायचं तर मरा.
- राज्य सरकार ३० % सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार, उद्योगधंदे बंद होत आहेत आणि सरकारी नोकर पण नरक्या गमावत आहेत, भाजपची घोषणा होती २०१४ ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ?