नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेल्या जावेद अख्तर यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात सांगितले की, ‘२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचे आरोपी अजूनही मोकळे फिरत आहेत.’ जावेद अख्तर नुकतेच लाहोर येथील अलहमरा कला परिषदेत आयोजित फैज महोत्सवात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेले होते. रविवारी कार्यक्रमाची सांगता झाली.
याच कार्यक्रमादरम्यान, प्रख्यात गीतकार जावेद अख्तर एका व्हिडिओमध्ये दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याविषयी आणि ‘भारतीयांच्या मनातील नाराजी’बद्दल बोलताना ऐकले जाऊ शकतात.
व्हिडिओमध्ये अख्तर म्हणतात, ‘आपण एकमेकांवर आरोप करू नये. यातून काही सुटणार नाही. वातावरण तणावपूर्ण आहे, ते शांत करणे आवश्यक आहे. आम्ही मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर झालेला हल्ला आम्ही पाहिला आहे. ते (हल्लेखोर) नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नाहीत.’ जावेद अख्तर पुढे म्हणाले, ‘ते अजूनही तुमच्या देशात मोकळेपणाने फिरत आहेत, त्यामुळे हिंदुस्थानींच्या मनात तक्रार असल्यास तुम्हाला वाईट वाटू नये.’
जावेद अख्तर म्हणाले की, ‘भारतीय लोक ज्या प्रकारे पाकिस्तानी दिग्गजांचे स्वागत करतात त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये भारतीय कलाकारांचे स्वागत केले जात नाही. “आम्ही नुसरत फतेह अली खान आणि मेहंदी हसन यांच्यासाठी मोठ्या उत्सवाचे आयोजन केले होते. तुम्ही (पाकिस्तान) लता मंगेशकर यांच्यासाठी कधीही कार्यक्रम आयोजित केला नाही?’