चंद्रपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 9 ऑगस्ट 2023 पासून ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावपातळीपर्यंत हा उपक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सन 2047 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार आहे. 2047 च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपुरचे नक्कीच योगदान राहील, अशी अपेक्षा पालकमंत्री सुुुुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
चांदा क्लब ग्राऊंड येथे ‘साद सह्याद्रीची…भूमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात भारताला भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त, समतायुक्त घडवायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे.
सद्यस्थितीत आपण भद्रावती येथून सीमेवरील आपल्या सैन्यासाठी बॉम्ब पाठवितो. चंद्रपुरात 122 एकर मध्ये असलेल्या सैनिक स्कूलमधून भविष्यात देशाच्या रक्षणासाठी हे सैनिक जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपले चंद्रपूर नेहमी अग्रेसर असले पाहिजे, चंद्रपुरचा गौरव वाढावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहनही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी केले.