सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मंत्री रविवारी दुपारी साताऱ्यात दाखल झाले असून, शासकीय विश्रामगृहात जोरदार खलबते सुरू होती. दरम्यान, मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा दौऱ्यात विशेष दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे व्हीआयपी सिक्युरिटीचा फटका दिग्गज नेत्यांना बसला. शासकीय विश्रामगृहात अनेकांना प्रवेश मिळाला नाही. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रमाबरोबर अनेक विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन शरद पवार व अजित पवार यांच्या हस्ते उद्या, दि. 9 रोजी होणार आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी शरद पवार यांचे रविवारी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. तेथेच त्यांचा मुक्काम आहे. कर्मवीरांना सोमवारी सकाळी अभिवादन केल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेची 39 वी वार्षिक सभा शारदाश्रम, जकातवाडी (सातारा) येथे होणार आहे. फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार व युवा साहित्य पुरस्काराचे शरद पवार व मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री वळसे पाटील, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह अनेक मंत्री व लोकप्रतिनिधी शासकीय विश्रामगृहात तळ ठोकून होते. मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. त्याचा फटका दिग्गजांना बसला. मंत्री, आमदारांच्या वाहनांशिवाय इतर कोणतेही वाहन शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सोडण्यात आले नाही. विश्रामगृहासमोर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांना प्रवेशद्वारातच अडवण्यात येत असल्याने त्यांचा पोलिसांशी वादही झाला.