मुंबई : करोना विषाणू संदर्भात लवकरच लस शोधून काढण्यात येईल, अशी माहिती पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली आहे. भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे, जिथे हा विषाणू मानवाच्या शरीराबाहेर ठेवण्यात यश आले आहे. त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न केला जात, असेही गंगाखेडकर यांनी सांगितले.
डॉ. रमण गंगाखेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, करोना व्हायरसने सध्या जगभरात धुमाकूळ घातला असून भारतातही त्याने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. करोना हा विषाणू मानवाच्या शरीराबाहेर राहणे कठीण आहे. मात्र, पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) संस्थेने हा विषाणू मानवी शरीराबाहेर ठेवण्यात यश मिळवले आहे. ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे, मानवी शरीरातील विषाणूंवर प्रयोग करणे धोकादायक आहे. हा विषाणू शरीराबाहेर असल्यानंतर तो विषाणूंची निर्मिती करतच असतो. परिणामी शरीराबाहेर विषाणूंवर कोणती लस काम करेल याचा शोध घेणे सोपं आहे. त्यामुळे लवकरच यावर लस शोधण्यात यश येईल, असे त्यांनी सांगितले.
संशोधन करणारा भारत जगातील पाचवा देश
चीनच्या वुहान प्रांतातून जगभर पसरलेल्या करोनाने आतापर्यंत जवळपास पाच हजार लोकांचा बळी घेतला आहे. तर, सव्वालाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. त्यामुळे या विषाणूवर लस शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. काही देशांना यात यश आले आहे. भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे, जिथे हा विषाणू मानवाच्या शरीराबाहेर ठेवण्यात यश आले असून त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही गंगाखेडकर यांनी सांगितले.