नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधीतांची संख्या 84 वर पोहोचली आहे. तर दिल्ली आणि कर्नाटकात प्रत्येकी एक असे दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रपती भवनात आयोजित केलेला पद्म पुरस्कार वितरण सोहोळा पुढे ढकलण्यात आला आहे. अनेक राज्यात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
कोरोना विषाणूंच्या साथीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राष्ट्रपती भवानात तीन एप्रिलला होणारा पद्म पुरस्कारांचा सोहोळा पुढे ढकलण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. या कार्यक्रमाची तारीख योग्यवेळी जाहीर करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे. महाराष्ट्र, प. बंगालसह अनेक राज्यांत शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
देशात 84 बाधीतांच्या संपर्कात आलेल्या चार हजार जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणणारे पहिले महान विमान मुंबईत शनिवारी मध्यरात्री दाखल होणार आहे. तर इटलीहून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान शनिवारी पाठवण्यात आले, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.