पाऊस आणखी लांबल्यास पाणीटंचाईचे चटके बसणार
रांजणी (वार्ताहर) – चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व यंदा सामाधानकारक पाऊस राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, अद्यापही पावसाने दडी मारल्याने कुकडी प्रकल्पातंर्गत असणाऱ्या धरणातील पाणीपातळी कमालीची खालावली असल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत पिंपळगाव जोगे शून्य, माणिकडोह 12.60, येडगाव 36.59, वडज 33.53, डिंभे 37.9 असा पाणीसाठा आहे. तरी पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून आणखी काही दिवस पावसाने अशीच दडी मारली तर पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आला आहे. शेतातील उभी पिके उत्पादन मिळूनसुद्धा केवळ बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने वाया गेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी यंदा उसाच्या लागवडीवर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे; याबरोबरच शेतकऱ्यांनी टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची अशी पिके घेतली आहेत. मात्र सध्या पाण्याची कमतरता शेतकऱ्यांना जाणवत आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालखंड लोटला. मात्र,अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरलेली नाहीत.
गेल्या वर्षी ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा मुबलक प्रमाणात झाला होता. मान्सून सक्रिय होण्याचे संकेत मिळत असले तरी पाऊस मात्र पडत नाही. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांमध्ये मुबलक पावसाची प्रतीक्षा आहे.
सध्या पावसाला पोषक हवामान स्थिती निर्माण न झाल्याने पुणे जिल्ह्यात इतरही भागात पावसाने दडी मारली आहे. मात्र येत्या काही दिवसांत ढगांची निर्मिती होऊ लागेल आणि जिल्ह्यात आणि राज्याच्या सर्वदूर भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.
– डॉ. अनुपम कश्यपी, वरिष्ठ हवामान तज्ज्ञ, वेधशाळा, पुणे