मुंबई – महाराष्ट्राने इंधनावरील कर कमी करावा, अशी सूचना पंतप्रधानांनी केल्यानंतर भाजप नेत्यांनीही त्या अनुरूप प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही भाजप नेत्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
एका फेसबुक पोस्टवर त्यांनी म्हटले आहे की, आज महाराष्ट्रात पेट्रोल आणि डीझेलवर 25 टक्के आणि 21 टक्के असा जो व्हॅटचा स्लॅब आकारला जातो त्याचा निर्णय फडणवीस सरकारच्याच काळात घेण्यात आलेला आहे. त्यात विद्यमान सरकारने वाढ केलेली नाही. उलट इंधनावर फडणवीस सरकारच्या काळात जो सेस आकारला जात होता त्यापेक्षा कमी सेस सध्या आकारला जातो आहे असे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, फडणवीस सरकार सत्तेवर असताना पेट्रोलवर 11 रुपये सेस आकारला जात होता. त्याच्या आधी सन 2014 ला राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते त्यावेळी पेट्रोलवर केवळ 1 रुपया इतका सेस आकारला जात होता. त्यात प्रचंड वाढ फडणवीस सरकारच्याच काळात झाली आहे.
या संबंधात अन्यही आकडेवारी सादर करून त्यांनी म्हटले आहे की, इंधन दरवाढीला राज्य सरकार जबाबदार आहे, हा आरोप पूर्णपणे चुकीचा व निराधार आहे. इंधनाच्या किंमती कच्चा तेलावर आधारित असतात असे सांगितले जाते, पण यूपीए सरकारच्या काळात कच्चा तेलाच्या किंमती प्रचंड महागल्या असताना इंधनाचे दर कमी ठेवण्यात आले होते, पण भाजप सरकारच्या काळात कच्चा तेलाचे दर कमी असूनसुद्धा इंधनाच्या किंमती मात्र प्रचंड वाढल्या आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर कच्चा तेलाच्या किंमती कमीकमी होत गेल्या. पण मोदी सरकारने त्या काळात उत्पादनशुल्क मात्र वाढवत नेले.
सन 2014 नंतर मोदी सरकारने पेट्रोल व डीझेलच्या दरात तब्बल 12 वेळा वाढ केली.त्यांनी पेट्रोलवरील कर 300 टक्के तर डीझेलवरील दर 800 टक्के इतका वाढवला आहे, असेही रोहित पवार यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. देशात जी महागाई निर्माण झाली आहे त्याला केंद्र सरकारच जबाबदार असताना राज्य सरकारांच्या नावाने टाहो फोडून परिस्थिती सुधारणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.