नवी दिल्ली -राजस्थान कॉंग्रेसमधील सत्तासंघर्षामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे काय होणार याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. अशातच भाजपच्या मित्रपक्षाचे नेते असणारे खासदार हनुमान बेनिवाल यांनी केलेल्या दाव्यामुळे सनसनाटी निर्माण झाली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे या गेहलोत सरकार वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेहलोत आणि राजेंमध्ये एकमेकांना मदत करण्याचा अंतर्गत समझोता आहे. त्यामुळे अल्पमतात आलेले गेहलोत सरकार वाचवण्यासाठी राजे प्रयत्नशील आहेत.
कॉंग्रेस आमदारांशी फोनवरून संपर्क साधून त्या बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यापासून दूर राहण्याचे आणि गेहलोत यांना साथ देण्याचे आवाहन करत आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा बेनिवाल यांनी ट्विटरवरून केला.