पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन
अमरावती : हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करावी, असे निवेदन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळण्याबाबत निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या झोपडपट्टी व जीर्ण चाळ सुधार विभागाच्या संयोजक छाया सुभाष राठोड यांच्याकडून प्राप्त झाले. त्यानुसार पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे भारतभूमीचे थोर सुपुत्र होते. ते कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक, हरितक्रांती, धवलक्रांतीचे प्रणेते, रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्रातील अनेक नाविन्यपूर्ण योजनांचे संकल्पक, विकासाचे महानायक होते. त्यांना भारतरत्न मिळण्यासाठी आपण केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.