पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पांजरपोळ संस्थेकडे रवानगी करण्याची मागणी
भोसरी – भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर आदी भागांमध्ये भटक्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही भटकी जनावरे कचरा कुंड्यांमधील टाकाऊ अन्नपदार्थ त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्या खात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भटक्या जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने काही जनावरे मरणासन्न झाली आहेत.
या भटक्या जनावरांची तपासणी करण्याबरोबरच त्यांची पांजरपोळसारख्या संस्थेकडे रवानगी केली तर त्या जनावरांची निगा राखली जाईल, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. भटकी जनावरे शहरात अडीच हजारांच्या पुढे आहेत. या भटक्या जनावरांना चारा मिळत नसल्याने त्यांना कचऱ्यातील अन्न खाण्याची सवय लागल्याने बहुतांश जनावरे गवत खात नाहीत. त्यामुळे ही जनावरे रात्री आणि पहाटेच्या वेळेस कचरा कुंड्यांमधील टाकाऊ अन्नपदार्थ खाताना दिसतात. नागरिकांद्वारे टाकाऊ अन्न प्लॅस्टिकच्या पिशव्यांत टाकले जाते. ही जनावरे प्लॅस्टिकसह अन्न खातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
काही जनावरांचे खूर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाढलेल्या खुरामुळे या जनावरांना चालताही येत नाही. बऱ्याच वेळा ही जनावरे डबक्यात जमा झालेले पाणी पितात त्यांना पाणी पिण्याची सोय देखील कोठेच केलेली दिसत नाही. त्याचप्रमाणे काही जनावरांच्या नाकातून पातळ द्रव सतत बाहेर येताना दिसतो. प्लॅस्टिक पोटात असल्याने काही जनावरांचे पोट प्रमाणापेक्षा वाढलेले दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ही जनावरे बऱ्याचवेळा रस्त्यावर थांबली असल्याने अज्ञान वाहनांच्या धडकेने जखमीही झालेली दिसून येतात.
काही नागरिक या भटक्या जनावरांना मार देऊन जखमीही करतात. त्यामुळे या भटक्या जनावरांचा जीव धोक्यात आला आहे. आतापर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सुमारे शंभर जनावरे पकडून पाजरपोळमध्ये जमा करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाद्वारे देण्यात आली.
प्लॅस्टिक बंदी नावापुरतीच
शहरात प्लॅस्टिक बंदी आहे. परंतु सर्वत्र शहरात प्लॅस्टिक पिशव्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नागरिक घरातील कचरा प्लॅस्टिक पिशवीत भरून घंटागाडी अथवा कचराकुंडीमध्ये टाकत असल्याने ही भटकी जनावरे तो कचरा प्लॅस्टिकसह खात आहेत. त्यामुळे शहरातील प्लॅस्टिक बंदी केवळ नावापुरतीच आहे असे देखील नागरिक बोलताना दिसून येत आहेत.
भटक्या जनावरांच्या नियोजनासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचा ठेकेदाराला ठेका देऊन त्यानंतर त्या त्या परिसरातील भटक्या जनावरांना पकडून पांजरपोळमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येतील.
-डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका