पिंपरी -गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वरुणराजाने विश्रांती घेतल्याने गणेशोत्सवाच्या तयारीत कोणतीही अडचण आली नाही. तसेच बाजारपेठेत देखील पूर्णवेळ गर्दी राहिली. यामुळे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, खरेदीसाठी बाहेर पडलेले गणेशभक्त आणि व्यावसायिक खुश झाले आहेत. दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर रात्री हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
शक्यतो गणेशोत्सवाच्या काळात पाऊस पडत असतो. परंतु सध्या पावसानेही उघडीप दिली आहे. धरणही शंभर टक्के भरले असल्याने न पाण्याच्या टंचाईची चिंता आहे ना पावसामुळे येणाऱ्या अडचणींची. सध्या गणेशोत्सव मंडळांची मंडप, सजावट अशी कामे अंतिम टप्प्यात होती. दोन ते तीन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे या कामांना वेग आला होता. तसेच पिंपरी व उपनगरातील बाजारपेठांमध्येही गर्दी ओसंडून वाहत होती. आसपासच्या ग्रामीण भागातून फुले, दुर्वा, केवडा व गणेशोत्सवासाठीचे इतर साहित्य घेऊन आलेले आणि उघड्यावर विक्री करत असलेल्या अनेक विक्रेत्यांना पावसाने यंदा मोठा दिलासा आहे.