माधव विद्वांस
प्रबोधनकार म्हणून ओळख असणारे, समाजसुधारक, लेखक, नाटककार, पत्रकार, इतिहासकार व संशोधक केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन (20 नोव्हेंबर, 1973). शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकारांचे पुत्र, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे नातू आहेत. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1885 रोजी पनवेल येथे झाला.
त्यांचे शिक्षण पनवेल व देवास येथे झाले. ठाकरेंचं मूळ आडनाव घोडपकर. नाशिक जिल्ह्यातल्या घोडप या किल्ल्याचे ठाकरे हे किल्लेदार होते. त्यांच्या आजोबांपर्यंत हे आडनाव सुरू होते. वडिलांनी प्रबोधनकारांचं नाव शाळेपासून ठाकरेच लावलं. शाळेत असतानाच प्रबोधनकारांनी “विद्यार्थी’ नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं.
त्यासाठी छोटेखानी छपाईचं यंत्रही बनवलं होतं. छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सामाजिक चळवळींमध्ये प्रबोधनकार सहभागी झाले होते.
स्त्रियांवरील अत्याचार असोत, अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्न असो; ते या सर्व प्रश्नांवर प्रबोधन करीत राहिले. आक्रमक शैलीतील भाषणे, लेखन व प्रत्यक्ष कृती या त्रिसूत्रीचा वापर करून पुराणमतवाद्यांबरोबर लढा दिला. पुण्यात असताना प्रबोधनकारांनी लोकहितवादी नावाचं एक साप्ताहिकही चालवलं होतं.
प्रबोधनकारांनी दादरमध्ये स्वाध्याय आश्रम नावाची संस्था सुरू केली. त्यातून हुंडा विरोधी संघ आणि गोविंदाग्रज मंडळ अशा आणखी संस्थांना सुरुवात झाली. गोविंदाग्रज मंडळाने अनेक ग्रंथ छापले. ते संगीतप्रेमी होते. ते दिलरुबा आणि सतार उत्तम वाजवत. प्रबोधनकारांनी संगीत सीताशुद्धी, संगीत विधिनिषेध, काळाचा काळ, टाकलेलं पोर आणि खरा ब्राह्मण ही नाटकं लिहिली.
कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथांसह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे अशी त्यांची साहित्य संपदा आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांना फार मोठा अभिमान होता.
सातारचे प्रतापसिंह महाराजांवर झालेल्या पदच्युतीचा, अन्यायाचा लंडनपर्यंत जाऊन आवाज उठविणारे रंगो बापूजी यांच्या त्यागाचा साद्यंत इतिहास “रंगो बापूजी’ या ग्रंथातून प्रथम त्यांनी मांडला. ते पुरोगामी, उदारमतवादी होते. सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. मात्र, धंदेवाईक भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते विरोधक होते. त्यांनी संत एकनाथांच्या जीवनावरील “खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून खऱ्या ब्राह्मणाची ओळख सांगितली.
त्यांच्या लेखनामध्ये व व्याख्यानांमध्ये समाजसुधारणाविषयक गोष्टींना प्राधान्य होते. प्रबोधनकार पट्टीचे वक्ते होते. समाजप्रबोधनासाठी व्याख्यानं देत ते महाराष्ट्रभर फिरले. इंदोरपासून गोव्यापर्यंत आणि धुळ्यापासून बेळगावपर्यंत सर्वत्र त्यांचा संचार होता. गोव्यातली देवदासी प्रथा संपवण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी गव्हर्नर जनरलकडे त्यांनी पहिल्यांदा केली होती.
हिंदू मिशनरी सोसायटीचे प्रचारक म्हणून प्रबोधनकार अनेक वर्षे काम करत होते. त्यांनी वैदिक विवाह विधीचे संपादनही केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अखेरच्या दिवसांत प्रबोधनकारांना बोलावून घेतलं होत. त्यावेळी सर्व पक्ष एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही, या धोक्याची कल्पना दिली. ही गोष्ट त्यांनी छापल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीला आकार आला.