पवनानगर – काकड आरती समाप्तीच्या महाप्रसादातून 65 भाविकांसह, काही ग्रामस्थांना विषबाधा झाली. मावळ तालुक्यातील भडवली गावात गुरुवारी (दि. 18) दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. जेवनानंतर सायंकाळी आणि आज, शुक्रवारी सकाळी बहुतेक नागरिकांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अंकुश मारुती लोहर, साधना लोहर व कार्तिकी भिलारे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पुण्यातील औंध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अन्य 50 हून अधिक ग्रामस्थांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच उपचारानंतर काहींना घरी ग्रामस्थांना “डिस्चार्ज’ देण्यात आला आहे.
दरम्यान, बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालय काले-पवनानगर येथे तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमातून विषबाधा झाली आहे. त्यामध्ये काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये 6 ते 7 लहान मुलांचा समावेश आहे.
पवनानगर येथील शासकीय रुग्णालयातील तीनही वार्ड फुल्ल झाले असून, काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंद्रनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा पाटील, डॉ. विश्वंभर सोनवणे, डॉ. पोपट आधाते, डॉ. शिवराज वाघमारे हे वैद्यकीय पथक रुग्णांवर उपचार करीत आहेत. या ठिकाणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस व वडगाव मावळचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
रुग्णालयातील बाधित रुग्णांमध्ये 3 ते 4 लहान मुलांचा समावेश आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच अजूनही काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच आणखी रुग्ण असल्याची माहिती ग्रामस्थांकडून प्राप्त होत आहे. त्यामुळे त्यांना देखील ग्रामीण रुग्णालय कान्हे फाटा येथे हलविण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. वर्षा पाटील
यांनी दिली.
सकाळी अचानक आम्हाला भडवली गावातून कळविण्यात आले की, अन्नातून नागरिकांना विषबाधा झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखणे, चक्कर येणे, मळमळ होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून आली आहेत. साधारणतः रुग्णालयात 28 ते 30 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये 5 ते 6 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना औंध हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील सर्व बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे काही रुग्णांना कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णलाय पाठविण्यात आले आहे.
– डॉ. वर्षा पाटील, ग्रामीण रुग्णालय, काले-पवनानगर.