माधव विद्वांस
समाजवादी नेते दिवंगत मधू लिमये यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आजपासून होत आहे. त्यांचा जन्म पुणे येथे 1 मे 1922 रोजी झाला. भारताच्या राजकारणात मधू लिमये एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहे. समाजवादाची नाळ त्यांनी कधीही तोडली नाही. आमदार-खासदाराच्या निवृत्तिवेतन ठरावास त्यांनी विरोध केला व स्वतः कधीही पेन्शन घेतली नाही. महाराष्ट्रामधे जन्म घेऊन बिहारच्या राजकारणात आपला ठसा उमटविणारे ते एकमेव नेते होते.
मधू लिमये यांचे शालेय शिक्षण मुंबई व पुणे येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन कॉलेज पुणे येथे झाले. याच काळात तत्कालीन समाजिक चळवळीचे अर्ध्वयू एस. एम. जोशी, सानेगुरुजी, शिरूभाऊ लिमये, ना. ग. गोरे यांच्या ते संपर्कात आले. या दरम्यान जयप्रकाश नारायण व राममनोहर लोहिया पुणे येथे आले होते. मधू लिमये यांची त्यांच्यावर छाप पडली. त्यांनी पुणे सोशालिस्ट कॉंग्रेसची स्थापना केली. 1938 मध्ये त्यांनी पुण्यात राष्ट्रीय कॉंग्रेसमधे प्रवेश केला, मात्र तेव्हापासून समाजवादी चळवळीशी त्यांनी बांधीलकी ठेवली.
1939 उजाडले महायुद्धाचे ढग जमू लागले होते व हीच वेळ स्वातंत्र्यासाठी योग्य आहे हे लक्षात आल्याने त्यांनी सक्रिय लढ्यात भाग घेतला. यावेळी मधू लिमये यांना चार वर्षे कारावास भोगावा लागला. राष्ट्रीय कॉंग्रेस व सोशालिस्ट कॉंग्रेस हे साधारण 10 वर्षे एकत्र काम करीत होते. 1948 मध्ये समाजवादी चळवळीने वेगळी राजकीय चूल मांडली.. 15 ऑगस्ट 1155 रोजी गोवामुक्तीसाठी आंदोलन सुरू झाले.
या आंदोलनात मधू लिमये व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाग घेतला. त्यावेळी त्यांना पोर्तुगीज सरकारने तुरुंगात टाकले. यावेळी त्यांना 12 वर्षांची शिक्षा झाली. मात्र 19 महिन्यानंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर मधू लिमये पहिल्यांदा महाराष्ट्रातून 1956 मध्ये मुंबईतील वांद्रे मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले; पण ते पराभूत झाले. महाराष्ट्र सोडून लिमये बिहारमधून चारवेळा लोकसभेवर 1964 ते 1977 दरम्यान निवडून गेले.
आणीबाणीत एक वर्षाने लोकसभेचा कालावधी वाढवला असतानाही पाच वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. आणीबाणीमध्ये जुलै 1975 पासून फेब्रुवारी 1977 पर्यंत मध्यप्रदेशातील वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगातून सुटल्यावर जयप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष स्थापन करण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. जनता पक्षातील दुहेरी सभासदत्वावरून पूर्वीच्या जनसंघातील लोकांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहभागावरून त्यांनी जनता पक्ष सत्तेवरून पायउतार होण्यासही भाग पडले.
सत्तेसाठी विचारांची बांधिलकी बाजूला पडलेली मधू लिमये यांना मानवणारे नव्हते. 1982 मध्ये ते राजकारणातून बाजूला झाले. त्यानंतर त्यांनी लेखनात काळ व्यतीत केला. त्यांनी हिंदी मराठी व इंग्रजी भाषांतून संसदीय कामकाज, त्यांची भाषणे, घटना दुरुस्ती, समाजवाद, राजकारण, त्यांच्या आठवणी, अशा विषयांवर 60 पुस्तके लिहिली. 8 जानेवारी 1995 रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.