नवी दिल्ली, दि. 30 -भारत आणि पाकिस्तान यांच्या प्रतिनिधींच्या चार दिवसांच्या वाटाघाटींसंबंधी आज येथे व इस्लामाबादमध्ये संयुक्त पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मे च्या शेवटी अगर जूनच्या सुरुवातीला नवी दिल्ली येथे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि अध्यक्ष भुट्टो यांची भेट होईल.
संयुक्त पत्रकात म्हटले आहे की, डिसेंबरच्या युद्धानंतरच्या पहिल्या शिखर बैठकीत ठरविण्यात आले आणि श्रीमती इंदिरा गांधी व मि. भुट्टो यांच्यात होणाऱ्या चर्चेतील विषयही निश्चित करण्यात आले. “अजेंड्या’चा तपशील मात्र या संयुक्त पत्रकात जाहीर केलेला नाही. दिल्लीतील वाटाघाटीत शेख मुजीब भाग घेणार की नाही, याबद्दलही पत्रकांत काहीच उल्लेख नाही.
संयुक्त पत्रक एकूण 370 शब्दांचे असून त्यात म्हटले आहे की, प्रतिनिधींची ही बोलणी मित्रत्वाच्या वातावरणात व एकमेकांची भूमिका समजूवन घेण्याच्या तयारीत झाली. अनेक गोष्टींवर- विशेषतः उपखंडात चिरस्थायी शांततेच्या प्रस्थापनेबाबतच्या विषयांवर चर्चा झाली. या वाटाघाटीत गांधी-भुट्टो भेटीचा पाया घालण्यात आला.
अजेंड्याविषयी अंदाज
रावळपिंडीमधील राजनैतिक गोटांतून असे समजते की, पुढील क्रमाने चर्चा होईल- व्याप्त प्रदेशातून सेना काढून घेणे व युद्धकैद्यांची अदलाबदल हे पहिले दोन मुद्दे असतील. त्यानंतर राजनैतिक संबंध व दळणवळण पुन्हा चालू करण्याविषयी चर्चा होईल. नंतर बांगला देशाला मान्यता, काश्मीर प्रश्न व यापुढे युद्ध टाळणे हे विषय चर्चेला घेतले जातील.
सिलोनमध्ये एक मे दिन सभांना बंदी
कोलंबो – सुरक्षिततेसाठी एक मे रोजी निदर्शने करण्या व सभा घेण्यास सिलोन सरकारने बंदी घातली आहे. गेल्या वर्षी आणीबाणी होती म्हणून मे दिनाचा कार्यक्रम झाला नव्हता.
निवडणूक संपली; पण कवित्व उरले आहे!
पाटणा – बिहार विधानसभेवर निवडून आलेल्या 39 सभासदांच्या निवडीस आव्हान देणारे अर्ज हायकोर्टाकडे आजवर दाखल झालेआहेत. 39 आमदारांपैकी 19 कॉंग्रेस, 8 सं. कॉं., 7 सोशलिस्ट जनसंघ, 1 शोषित दल व 3 अपक्ष आहेत. सोशलिस्ट पक्षाचे अध्यक्ष कर्पूरी ठाकूर यांच्या विरुद्धही अर्ज आला आहे.