बौद्ध धर्माचे अभ्यासक, लेखक, नाटककार, जगद्विख्यात पंडित धर्मानंद कोसंबी यांचा आज स्मृतिदिन (4 जून 1947). त्यांचा जन्म साखवाळ या गोव्यामधील खेडेगावात झाला. तेथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. वर्ष 1891 मध्ये ते पुण्याला आले. रा. गो. भांडारकर ह्यांच्या मदतीने पुण्यातही काही संस्कृताध्ययन केले. त्याचवेळी त्यांचे लक्ष बौद्धसाहित्याच्या अध्ययनाकडे वळले.
वर्ष 1897 मध्ये एका मराठी नियतकालिकातील गौतम बुद्धांवरील लेख वाचून, त्यांचे बौद्ध धर्माविषयी कुतूहल जागृत झाले. त्यासाठी संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी 1899 मध्ये त्यांनी पुणे, ग्वाल्हेर, काशी येथे जाऊन संस्कृतचा अभ्यास केला. काशीत तर अन्नछत्रात केवळ एक वेळ भोजन करून त्यांनी अध्ययन केले. त्यानंतर ते नेपाळला गेले; परंतु तेथील बौद्ध धर्माची अवनती पाहून ते गया येथे परतले. तेथे एका बौद्ध भिक्खूने त्यांना पाली शिकण्याबद्दल सुचविले. त्यासाठी ते श्रीलंका व ब्रह्मदेशात गेले. तेथे बौद्धविहारांमधून भिक्खू धर्माची दीक्षा घेऊन, त्यांनी पाली भाषा-साहित्याचा सखोल अभ्यास केला. तथापि, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते भारतात परत आले व त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यांनी कलकत्ता विद्यापीठात रिडर म्हणून काम केले. नंतर रिसर्च फेलो म्हणून काम करण्यासाठी बडोदा येथे आले.
बडोद्याच्या मुक्कामात सयाजीराव महाराजांनी त्यांना आर्थिक मदतही केली होती. शेवटी काही दिवस पुण्यातील फर्ग्यसन महाविद्यालयात गेले. हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक चार्ल्स रॉकवेल लॅनमन यांनी त्यांना बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित “विष्णुधमग्गा’ या अत्यंत गंभीर विषयावरील आवृत्तीचे संकलन पूर्ण करण्याचे काम सोपवले होते. या पुस्तकाची मूळ सुरुवात हेन्री क्लार्क वॉरेन यांनी केली होती. त्यांनी त्यांचा मुलगा दामोदर आणि मुलगी माणिक हिला अमेरिकेतील बोस्टन केंब्रिज लॅटिन स्कूलमध्ये शिकवले.
वर्ष 1929 मध्ये ते रशियाला गेले आणि तेथे लेनिनग्रांड विद्यापीठात पाली भाषेचे शिक्षण दिले. कोसंबी यांनी मुंबई येथे बौद्ध भिक्खूंसाठी एका विहाराची स्थापना केली. त्यांच्या साहित्यसंपदेमध्ये बुद्धधर्म आणि संघ, बुद्धलीला सारसंग्रह, समाधिमार्ग, बौद्धसंघाचा परिचय (1926), हिन्दी संस्कृती आणि अहिंसा, सुत्तनिपात (1955), भगवान बुद्ध (पूर्वार्ध, उत्तरार्ध), जातककथा संग्रह, बोधिसत्त्व (नाटक), भगवान बुद्ध, लघुपाठ, या ग्रंथांचा समावेश आहे. वर्ष 1937 मध्ये सुत्तनिपात या बौद्धग्रंथाचे मराठी भाषांतर नियतकालिकातून प्रसिद्ध केले आणि वर्ष 1955 मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले.
“बोधिसत्त्व’ ह्या नाटकात तथागतांच्या मनात संन्यासविषयक विचार आधीपासूनच होते, वैयक्तिक दुःखापेक्षा सामाजिक दुःखामुळे ते विरक्त झाले, अशाप्रकारची मांडणी केली आहे. कोणत्याही उच्च शिक्षणाशिवाय त्यांनी केलेले संशोधन व लेखन दीपस्तंभासारखे आहे. त्यांची विचारसरणी समाजवादाच्या बैठकीवर असल्याने लेखनात आधुनिकता दिसून येते.
– माधव विद्वांस