भारतातील महान शास्त्रीय गायक उस्ताद बडे गुलामअली खॉं यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 2 एप्रिल 1902 रोजी आताच्या पाकिस्तानातील लाहोर शहराजवळील कसूर या गावी झाला. भारतात शास्त्रीय संगीताची परंपरा भरतमुनींपासून हजारो वर्षांपूर्वीची आहे. कालानुरूप त्यावर संस्कार होत गेले. साधारणतः इ. स. 700 ते इ. स. 1200 दरम्यान या कलेला अस्थिरतेमुळे राजाश्रय मिळाला नाही. मुघल, विजयनगर राजवटीत पुनःश्च संगीताला राजाश्रय मिळाला. 17 व्या शतकापासून तसेच राजस्थानमधील संस्थानिक व ग्वाल्हेर, इंदौर संस्थान यामध्येही कलेचे चीज होऊ लागले व त्यावरून गायकीची घराणी निर्माण होऊ लागली. त्यामुळे सुफी संगीताच्या सांस्कृतिक अभिसरणामुळे संगीत अधिक दर्जेदार बनले.
त्यातूनच “ठुमरी’ या शैलीचा जन्म अवधच्या नवाब वाजिदअली शाहच्या दरबारात झाला. भारतीय संगीतकारांबरोबर अनेक मुस्लीम संगीतकारांनीही भारतीय शास्त्रीय संगीताचा स्वीकार केला. ठुमरीसम्राट बडे गुलामअली त्यातीलच एक प्रमुख नाव. त्यांचे वडील अलीबक्ष खॉं हे काश्मीरचे महाराजाच्या दरबारी गायक होते आणि त्यावेळी त्यांच्या घराण्याला काश्मिरी घराणा असे म्हणत. जेव्हा ते पतियाला येथे आले तेव्हा त्यांना पतियाला घराण्याचे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे वडील एक प्रसिद्ध सारंगी वादक आणि गायक होते. त्यांच्या गायकीवर पंजाबी शैलीचा मोठा प्रभाव होता.
तत्कालीन प्रसिद्ध गायक आणि संगीतकार काका कालेखान यांच्याकडून उस्ताद बडे गुलामअली यांनी संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले. विशेष म्हणजे ते रोज 15 ते 20 तास रियाज करायचे. ते 20व्या शतकातील तानसेन म्हणून ओळखले जातात. आपल्या अभूतपूर्व संगीत साधनेमुळे भारतातील शास्त्रीय संगीतात त्यांचे नाव सुवर्णक्षरांनी लिहिले गेले. त्याकाळी अब्दुल करीम खान, अल्लादिया खान आणि फैज यांच्यासारखे दिग्गज गायक आघाडीवर होते. पण उस्ताद बडे गुलाम अली यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ठुमरी गायनाचा ठसा शास्त्रीय संगीतात उमटविला.
वर्ष 1919च्या लाहोर संगीत संमेलनात बडे गुलामअली यांनी सार्वजनिकपणे प्रथमच आपली कला सादर केली. कोलकाता आणि अलाहाबाद येथील संगीत संमेलनांमुळे त्यांची कीर्ती सर्वदूर झाली. त्यांनी पारंपरिक सांगीतात बदल करून रसिकांना अभिप्रेत असलेल्या चीज बनविल्या.त्यांनी अदाना, भूपली, हमीर, जयजयवंती आणि जौनपुरी यासारख्या हलक्याफुलक्या रागांमध्ये “सबरंग’ या नावाने रचना केल्या. विरहाची वेदना अधिक उत्कट, दर्शविणारा सिंधू भैरवीतला त्यांचा सुप्रसिद्ध दादरा म्हणजे “का करूँ सजनी, आये न बालम’ हा दादरा येसूदास यांनीही गायला होता, पण मूळ गायक बडे गुलामअली होते. सुरुवातीला त्यांनी चित्रपटांमध्ये गाण्यास नकार दिला. पण “मुगल-ए-आजम’सारख्या चित्रपटात आपला आवाज देण्यास त्यांनी मान्य केले. या चित्रपटात तानसेनसाठी त्यांनी आपला आवाज दिला.
त्यांच्या आवाजातील लवचिकता आणि बारकाई यामुळे त्यांचे वेगळेपण उठून दिसे. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले, पण जन्मभूमीमध्ये राहून कर्मभूमीची ओढ लागली व पंतप्रधान नेहरू, तत्कालीन मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या मदतीने त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळवले आणि मलबार हिल येथील बंगल्यात राहाण्यास आले. त्यांचे वास्तव्य मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता येथे असायचे. बडे गुलामअली यांना म. गांधींसमोर भजन गाण्याची संधी मिळाली व त्यावेळी “राधेश्याम बोल’ हे भजन त्यांनी गायले त्यामुळे म. गांधी खूप प्रभावित झाले होते. पं. नेहरूही त्यांचे चाहते होते.
त्यांना पद्मपुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे कोलकाता येथे 25 एप्रिल 1968 रोजी अर्धांगवायूच्या आजाराने निधन झाले. अभिवादन.
– माधव विद्वांस