बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर एका बाबतीत खूपच आनंदित आहे की, तिला अक्षय, ऋतिक आणि रणवीरसोबत काम करण्याची संधी मिळाली. ती याबाबत म्हणते की, माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते आहे.
ऋतिकसोबत वाणीने “वार’ या चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर “शमशेरा’ या चित्रपटात वाणी रणवीरसोबत दिसणार आहे. तर वाणीचा आगामी बहुचर्चित “बेल बॉटम’ या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.
याबाबत वाणीने म्हटले की, मी खूपच खूश आहे आणि यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. कारण चित्रपट सृष्टीत या दिग्गजांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली. मी नेहमीच अक्षय, ऋतिक आणि रणवीरला आदर्श मानले आहे. मला त्यांचे चित्रपट खूप आवडतात त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे स्वप्न साकार होण्यासारखेच आहे.
वाणीने पुढे म्हटले की, ऋतिक असाधारण प्रतिभाशाली आहे. तो कोणत्याही कामात स्वतःला झोकून देतो. त्याची हीच कृती आजूबाजूच्यांना प्रेरणा देते. रणवीर शालीन आणि शांत स्वभावाचा आहे. त्याच्या अभिनयातील करिष्मा पडद्यावर दिसतोच. तर अक्षय निश्चितच एक आदर्श मूर्ती आहे. चित्रपट सृष्टीतील सर्वश्रेष्ठ असणाऱ्यांमधील तो एक आहे. त्याचे चित्रपट सृष्टीतील योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशा शब्दांत वाणीने या तिघांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.