रेडा – सर्वसामान्य, गरीब माणसाला ग्रामपंचायतीची प्रशासकीय जबाबदारी द्या, त्यांना संधी देण्यासाठी गावातील पुढाऱ्यांनी शिफारस करावी, अशी विनंती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कालावधी संपुष्टात आला आहे. अशा ग्रामपंचायतींवर शासनाच्या माध्यमातून प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमच्या घरात द्या, माझा माणूस करा, अशा मागण्या आता होऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या उलट पवित्रा घेतला आहे.
अशी विनंती चक्क राज्यमंत्र्यांनी केल्यामुळे प्रशासक म्हणून सामान्य, गोरगरीब नागरिकांना काम करण्याची संधी मिळणार हे मात्र नक्की. कित्येक वर्षे पद भोगलेल्या तसेच तालुक्याच्या पदावर असताना गावगाडादेखील आम्हीच चालवावा, अशी भावना असंख्य कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहेत. वर्षानुवर्षे आपण गावाच्या मानाच्या खुर्च्या सांभाळल्या आहेत. ज्या गोरगरिबांनी आपल्याला या खुर्चीवर जाण्यासाठी मदत केली.
अशा गरिबांना प्रशासक म्हणून संधी देण्यासाठी शिफारस करा. तुम्हाला गोरगरीब जनता कधीही विसरणार नाही. जर गोरगरीब नागरिकांना या पदावर संधी मिळाली तर उपेक्षित भागाचा गावाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास झालेला पाहावयास मिळेल, याची खात्री आहे. अशी विनंती आपल्या निवासस्थानी सातत्याने गर्दी करणाऱ्या गावपुढाऱ्यांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.
मी गोरगरिबांसाठी काम करणार, गोरगरीब जनतेची कामे केले तर आयुष्यभर विसरले जात नाही, असे ते खुलेपणाने जाहीर करत असतात. त्यातच राज्यमंत्री भरणे यांना आयतीच संधी मिळाली आहे.
तालुक्यातील कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतींवर गोरगरीब कुटुंबातील सामान्य माणूस पोहोचणार याची चर्चा रंगली आहे. यामुळे सल्ल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एक निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याची भूमिका भरणे यांच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळे इंदापूर तालुक्याचे आगामी चित्र वेगळे दिसणार आहे.
परंपरा संपणार गरिबांचे दिवस येणार
मंत्रिपद म्हटलं की, मोठा लवाजमा तसेच अनेक राजकीय लोकांचा सहवास आला. परंतु राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे मंत्री झाल्यापासून, साधेपणाने सामान्य जनतेत मिसळणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, असा हा नेता असल्यामुळे गरिबांचे दिवस येणार आहेत. आता प्रशासक निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच गोरगरीब, मागासवर्गीय नागरिकांना संधी देणार, असा शब्द राज्यमंत्री भरणे यांचा असल्यामुळे घराणेशाही आणि पिढ्यान्पिढ्या खुर्चीवर बसणाऱ्यांची परंपरा संपणार हे मात्र नक्की, अशा चर्चेला मात्र उधाण आले आहे.