लोणावळा, (वार्ताहर) – वलवण नांगरगाव रस्त्यावरील इंद्रायणी नदी पुलाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून संथ गतीने सरू आहे. ते लवकर पूर्ण करून हा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्याची मगणी कर्मयात येत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून वलवण नांगरगाव मार्गावरील पुलाचे नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम सुरू असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून नागरिक बापदेव रोडचा वापर करत आहेत. मात्र, हा वळसा खूप लांब पडत आहे.
परिणामी वेळ आणि आर्थिक नुकसान होते. नांगरगाव येथे औद्योगिक वसाहत असून याठिकाणी कामाला येणारे अनेक कामगार हे वलवण, वरसोली, वाकसई, तुंगार्ली या भागातील असल्याने त्यांना कामाला येताना तसेच जाताना पूर्णतः वळसा घेऊन जा – ये करावी लागत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या मालवाहू वाहनांना रेल्वे विभागातून यावे लागते.
शाळकरी मुले व महाविद्यालयीन मुले, दुग्ध व्यवसायिक यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम लवकर पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.