पवनानगर, {नीलेश ठाकर} – वादळ वाऱ्याचा हवामानाचा इशारा. मावळच्या लाल मातीतील शेतात काडीकचऱ्यावर पोट भागविणाऱ्या हजार मेंढ्या. खतावणीसाठी शेतात बसलेल्या. राखणीला घनगर कुटुंबातील आजोबांपासून लहान मुले, बाया बापडे, गुरुवारी सायंकाळी वादळ वाऱ्याने अचानक फेर धरला. डोईवरचा कापड दूर सरला. विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट. अंगाचा थरकाप उडविणारा पाऊस कोसळला. आभाळाखाली थाटलेला संसार अंगावरचे कपडे पिळत पुन्हा नव्याने सुरू झाला.
मराठी चित्रपटातील हे एखादे दृश्य नव्हे. मेंढपाळ या भटक्या धनगर समाजातील हे वास्तव चित्र आहे. गुरूवारी (दि. १६) सायंकाळी झालेल्या पावसाने या मेंढपाळ कुटुंबाची त्रेधातिरपीट उडाली. चिमणपाखरांपासून प्रत्येकालाच वाटतं आपलं घर असावं. या भटकंती करणाऱ्या मेंढपाळ कुटुंबांचे घर म्हणजे शिवार आणि डोईवरचे छत म्हणजे आभाळ.
जीवन मरणाच्या या संघर्षात कितीही आबाळ होवो, संकटे झेलण्याची त्यांनी हिम्मत कधी हरली नाही. मेंढपाळ कुटुंब शिवारात मेंढ्यांच्या कळप घेऊन चराईसाठी शेतात पाल टाकून आहेत. त्यापोटी शेतात मेंढ्या बसल्याने त्यांच्या लेंड्या-मूत्रापासून शेताची खतावणी होते. त्यांचा ठिय्या गेल्या एक महिन्यापासून पाण्याची सुविधा असल्याने मावळ तालुक्यात होता. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना बैलबंड्यातून हा संसाराचा गाडा कासरा हाती घेत महिलाच पुढे हाकतात.
चुलीवरच्या भाकरी संग कसंबसं पोट भरावं. दुपारभर अंगावर ऊन, कधी वादळ वाऱ्याची धूम. आमचे लई येले होतात. आमच्यासाठी कोण येणार धावून? मेंढ्यांशिवाय बाहेरचं जग नाही माहित.’ असे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मेढपाळ बाबाजी खरात सांगतात.
राज्याच्या इतर जिल्ह्यातून तिसऱ्या-चौथ्या पिढीने स्थलांतर करत मेंढी पालनासाठी मावळ तालुका गाठला. आम्ही आठ महिने बाहेर राहतो अन् चार महिने गावाकडे. सध्या खरात हे धनगर कुटुंब मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात वसले आहे.
मात्र, मेंढ्या चराईसाठी त्यांची शेतशिवार, रानावनात बारमाही भटकंती सुरू असते. हजारो संख्येने असलेल्या मेंढ्यांना जगवणे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. त्यातच वनविभागाने चराईबंदी केल्याने मेंढ्यांचे पोट कसे भरावे, याचीच चिंता त्यांना पडलेली असते.
मतदान म्हणजे काय रे भाऊ?
कुटुंब मेंढपाळाचा व्यवसायात गुंतली असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे खोबरे होत आहे. घरकुल नाही, रेशनही बंद झाले. त्यांना कुठल्याही शासकीय सुविधांचा लाभ माहित नाही. शिक्षण नोकरीतील आरक्षण हा विषय त्यांच्या गावी नाही.
एवढेच काय, मतदान म्हणजे काय रे भाऊ, अशी विचारणा करणारे धनगर बांधव लोकशाहीच्या उत्सवात रानावनातील भटकंतीमुळे मतदानाचा हक्कही बजावता आला नाही. आयुष्य जगण्यासाठी चाललेली त्यांची भटकंती केव्हा थांबेल? या प्रश्नाचे उत्तर प्रशासकीय व्यवस्था देऊ शकेल का?