वडगाव मावळ {किशोर ढोरे} – मावळ तालुक्यात शनिवारपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, फक्त पिकांचेच नसून अनेक ठिकाणी वीटभट्टी व्यवसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसाने विरघळल्याने वीटभट्टी मालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
मावळ तालुका तसेच कर्जत, खालापूर, खोपोली भागात गुरुवारी सायंकाळी अतिजलद गतीने वारे वाहत होते. तर, सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागात शेतीपूरक असलेल्या वीटभट्टी व्यवसायिकांचेही मोठे नुकसान होऊन त्यांनाही आर्थिक फटका बसला आहे.
विटभट्टीत भाजण्याच्या तयारीत असलेल्या तसेच, तयार करून ठेवलेल्या कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसाने विरघळल्याने वीटभट्टी मालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात वीटभट्टीचा व्यवसाय करतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये शेतकरी मातीच्या विटांचा वीटभट्टी व्यवसाय करतात.
पुन्हा एकदा आर्थिक संकट
आधी सिमेंट विटा तसेच सिफॉरेक्स विटांनी मातीच्या विटांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. केवळ कच्च्या मालाच्या भावात वाढ झालेली नसून वाहतूकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विटा महागल्याने अनेक बांधकाम व्यावसायिक विटांना पर्याय शोधत आहेत.
करोना काळात बांधकामे बंद असल्याने बँकेचा हप्ता कसा भरायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. करोनाच्या संकटामुळे वीटभट्टी व्यावसायिक आर्थिक संकटात असतानाच आता कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वीटभट्टी मालकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवले आहे.
अनेकवेळा अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु, शासन वारंवार याकडे दुर्लक्ष करीत असून, शासनाकडून आजतागायत कोणत्याही प्रकारचा अर्थसहाय्य वीटभट्टी व्यवसायिकांना मिळाले नाही, असे वीट उत्पादकांचे म्हणणे आहे.
वीटभट्टी मालकांची नुकसान भरपाईची मागणी
अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला असल्याने, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाने करावे व वीटभट्टी व्यावसायिकांना भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी, अशी मागणी वीटभट्टी व्यावसायिकांकडून केली जात आहे.