मंत्री चव्हाण यांची माहिती : पालखी तळाची पाहणी
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे (ता. पुरंदर) येथे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी शनिवार (दि.17) विसावणार आहे. यादरम्यान, पालखी तळाची व पालखी महामार्गाची पाहणी दौरा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. यावेळी पालखी तळापासून पर्यायी रस्त्याचे काम सुरू असून त्यासाठी जादा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी, ग्रामस्थांनी पालखी तळापासून पर्यायी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, या उपलब्ध निधीतून हा रस्ता पूर्ण होत नसल्याने रस्त्याचे काम अर्धवट राहील. मात्र, रस्त्यासाठी अधिक निधी उपलब्ध देऊन हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यावेळी मंत्री चव्हाण यांनी उर्वरित रस्त्यांसाठी बांधकाम विभागाकडून राहिलेला रस्ता पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, पुरंदर-हवेली भाजपचे विधानसभा निवडणुक प्रमुख बाबाराजे जाधवराव, युवा मोर्चाचे सचिव शैलेश तांदळे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, उद्योजक सुनील पवार, राहुल यादव, तानाजी पवार, सागर भुजबळ, प्रदीप चव्हाण, बाळासाहेब पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
भरउन्हात अनवाणी दर्शन
यावेळी दुपारी भरउन्हात मंत्री चव्हाण यांनी पायातील बूट बाजूला काढून वाल्हे येथील पालखी मैदानावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज विसावा ओट्याचे दर्शन घेतले. दरम्यान, तळपत्या उन्हामध्ये पायातील बूट काढू नका, असे उपस्थित सांगत असतानाही त्यांनी बूट बाजूला काढून विसावा ओट्याचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी अडीअडचणीबाबत ग्रामस्थांशी विचारपूस केली. मागील अनेक वर्षांपासून अनेक मंत्री, देवस्थान, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदींनी पालखी तळावर भेट दिली आहे. मात्र, शुक्रवार (दि.9) चव्हाण यांनी श्रद्धा भावनेतून, कडक उन्हात ओट्याचे दर्शन घेतल्याने मान्यवरांसह, ग्रामस्थांना कुतूहल वाटले.