श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यातील समाज आरतीस वैष्णवांची दाटी
वाल्हे – धन्य धन्य ज्ञानेश्वरा । अलंकापुरी समाधी स्थिरा ।।
कृष्ण पक्षी तुझ निर्धारा । मी भेटी देत जाईल ।।
ही भावना मनी ठेऊन कपाळी बुक्का, गंध लावून खांद्यावक भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींच्या वाल्हेनगरीत ज्ञानबा-तुकारामचा जयघोष करीत, श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहुन आळंदीकडे मार्गस्थ झालेल्या श्री पांडूरंग पालखी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथे सायंकाळी विसावला.
सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर निरा नदीवरील दत्तघाटावर पांडुरंगाच्या पादुकांना पवित्र स्नान घालून, दुपारची विश्रांती घेऊन, पालखी सोहळा महर्षि वाल्मिकींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावरती सायंकाळी विसावला. सुकलवाडी (ता.पुरंदर) फाट्यावरील पालखी तळावरती वाल्हे ग्रामस्थांच्यावतीने सरपंच अमोल खवले, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, हनुमंत पवार यांनी स्वागत केले. यावेळी टाळ-मृदंगाचा गजर ज्ञानदेव तुकारामांच्या जयजयकाराने संपूर्ण पालखीतळ भक्तिमय झाला होता. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आरती झाली.
यावेळी, माजी सरपंच इंदुबाई पवार, उद्योजक गोरख कदम, सत्यवान सूर्यवंशी, अतुल नाझरे, त्रिंबक भुजबळ, सागर भुजबळ, माणिक महाराज पवार, अशोक महाराज पवार, सुकलवाडीचे माजी उपसरपंच धनंजय पवार, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पवार आदींसह ग्रामस्थ समाज आरतीस उपस्थित होते.
यावेळी महसूल विभागातील सर्कल संदीप चव्हाण, तलाठी निलेश अवसरमोल, कोतवाल आनंद पवार, जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, हवालदार केशव जगताप, संतोष मदने, घनश्याम चव्हाण, प्रशांत पवार, प्राथमिक आरोग्य उपेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत आंधळे व त्यांचे आरोग्य सेवक, महावितरणचे दत्ता पवार आदींसह अधिकारीवर्गाने चोख व्यवस्था ठेवली होती.
वैष्णवांचे हाल
नीरा ते वाल्हे येथील पालखी तळावर पोहोचण्यास श्री पांडुरंग पालखी सोहळ्यास अरुंद पालखी महामार्ग व या अरुंद पालखी महामार्गावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे व या महामार्गावरील वाहतुकीने हजारो वैष्णवांना मोठे हालअपेष्टा सहन करीत पालखी मुक्कामी स्थळावर पोहोचवे लागले.
सातारा जिल्ह्यात पायी पालखी सोहळ्यास कोणताही अडथळा आला नव्हता. संबंधित प्रशासनाने याबाबत लक्ष देऊन, पायी पालखी सोहळ्यास सहकार्य करावे.
– संदीप कुलकर्णी, व्यवस्थापक, पालखी सोहळा
पादुकांना नीरा स्नान
नीरा – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या पांडूरंगाच्या पादुका मागील काही वर्षांपासून आळंदीला जात आहेत. सोमवारी (दि. 14) सकाळी साडेआठच्या सुमारास पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तिर्थात विठ्ठल नामाच्या जयघोषात मोठ्या भक्तीमय वातावरणात स्नान घालण्यात आले.
पंढरपूरच्या पाडुरंगाचा पायी पालखी सोहळा 2014 पासून सुरू झाला आहे. यावर्षी पांडुरंग पालखी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे 15 तर रथा मागे 10 दिंड्या चालत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या यावारीत सहभागी झाले आहेत. पाच हजार वारकरी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या दोन टॅंकरद्वारे सोहळ्यातील वारकऱ्यांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती सोहळा प्रमुख विठ्ठल वासकर यांनी दिली.
कार्तिकी पौर्णिमेला पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपूर येथुन निघाला आहे. अष्टमीला आळंदीला दाखल होणार आहे, अशी माहिती सोहळा व्यवस्थापक प्रमुख संदीप महाराज कुल्कर्णी यांनी दिली आहे. नीरेतील बाजार पेठेत पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे विविध ठिकाणी स्वागत करून पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले गेले.