लांडेवाडीत बालनाट्य
मंचर – विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा यांसारख्या अन्य क्षेत्रातही आपली आवड जपून नावलौकिक कमवावा. त्यातून शाळेचे, आई-वडिलांचे व गुरुजनांचे नाव मोठे करावे असा मौलिक सल्ला बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पेक्षागृहात राज्यभर गाजलेलं विश्वविक्रमी मराठी बालनाट्य अलबत्या गलबत्या आयोजित करण्यात आले होते. आढळराव पाटील बोलत होते. ते म्हणाले, बालपण हे निरागस आणि स्वच्छंदी म्हणून जीवन जगण्याचे वय असते. लहान मुलांना पाहून मला अतिशय तजेलदारपणा जाणवतो.
मुलांच्या शालेय जीवनात यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळावे. त्यांच्यात स्टेज डेरिंग निर्माण व्हावी या करिता येथे दर्जेदार प्रेक्षागृह उभारले आहे. येथील ग्रामीण भागातील लोकांना मराठी नाटक थेट पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे. या संस्थेतील इंग्लिश स्कूल शाळेच्या सुमारे 1800 विद्यार्थ्यांनी अलबत्या-गलबत्या या बालनाट्य प्रयोगाचा आनंद घेतला. यावेळी 66 फूड स्टॉल उभारले होते. त्याचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.