थेऊर -करोना संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येही जिल्ह्यातील सरपंच किंवा उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे अथवा इतर कारणाने रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी, याकरिता संबंधित तहसीलदार यांना निर्देश देण्यात यावेत. सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने एका परिपत्रकाद्वारे बजावले आहेत. त्यामुळे सरपंच व उपसरपंच यांच्या रिक्त झालेल्या पदी संबंधित ग्रामपंचायतीला कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत ग्रामपंचायतीचे कारभारी सरपंच अथवा उपसरपंच यांच्या निवड प्रक्रियेच्या ग्रामपंचायत बैठकीदरम्यान शासनाने बाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणेबाबत संबंधिताना आवश्यक सूचना देण्याकामी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व यांना महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी लेखी आदेश दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निवडणुकीशी संबंधित कामकाज आहे त्या टप्प्यांवर स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दि. 17 मार्च रोजीच्या पत्रान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना माहिती दिल्याने ग्रामपंचायतीच्या स्तरावरील निवडणूक रणधुमाळी ही पूर्णपणे आहे. त्या टप्प्यावर स्थगित ठेवलेली आहे.
दरम्यान, कारभारी निवडण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात राजकीय हवा चांगलीच तापणार आहे.
कोल्हापूरच्या प्रस्तावावर जिल्ह्याला दिलासा
दरम्यान, कोल्हापूर जिल्हयातील ग्रामपंचायतीकडून सरपंच व उपसरपंच निवडीबावत वारंवार विचारणा होत आहे. ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत सरपंच व उपसरपंच यांच्या राजीनाम्याचे वाचन झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच निवडीच्या आदेशाकरिता जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले जात आहेत.
ग्रामपंचायतींनी घेतलेल्या मासिक सभेमध्ये सरपंच व उपसरपंच हे निवडणूकविषयक कामकाज घ्यावे अगर कसे याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास संदर्भिय पत्रान्वये विनंती केली होती. त्यामुळे राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सर्व जिह्यांतील सरपंच, उपसरपंच यांच्या रिक्त निवडीबाबत आदेश काढल्याने ग्रामपंचायतींना कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.