सातारा – जिल्ह्यामध्ये पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली असून पैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक परिसरामध्ये मास्क वापरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
करोनाच्या वाढत्या संसर्ग पार्श्वभूमीवर
आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हाधिकारी जयवंशी यांनी यासंदर्भामध्ये काही महत्त्वाचे आदेश पारित केले आहेत. करोना संसर्गामध्ये पन्नास वर्षांवरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कर्करोग, किडनीचे आजार असलेले रुग्ण व यापूर्वी कोविडची लागण होऊन गेली आहे अशा नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी वेळोवेळी जेवणापूर्वी नियमित हातपाय स्वच्छ धुणे, शिंकताना व खोकताना नाकातोंडावर रुमाल धरणे, हस्तांदोलन टाळणे, चेहरा, नाक, डोळे वारंवार स्पर्श न करणे आणि विशेष म्हणजे गरज नसताना गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी जाणे टाळणे इत्यादी उपायोजना सुचवण्यात आल्या आहेत. आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्क वापरावा, अधिक संख्येने एकत्र येणे टाळावे आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे.
शासकीय कार्यालयात मास्कचा वापर अनिवार्य
राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी व उपायोजना राबवण्याविषयी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी उपाययोजना करण्याबाबत केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बॅंका, शाळा, महाविद्यालये यांमधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच आठवडी बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे.