सातारा -माण, खटावमध्ये टंचाईस्थितीची चाहूल लागताच उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले एसून दोन्ही तालुक्यांना पूर्ण उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही, अशी ग्वाही आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. माण- खटावच्या शेतकऱ्यांनी उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. एप्रिलमध्ये थोडीफार टंचाई जाणवू लागताच उरमोडी प्रकल्पाचे पाणी खटाव तालुक्यात आले. संपूर्ण उन्हाळा दोन्ही तालुक्यांना पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन करण्यात आल्याचे आ. गोरे यांनी सांगितले. गेल्या वर्षी
चांगला पाऊस झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी या वर्षी बागायती पिकांची लागवड केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून बागायती पिकांना पाण्याची गरज भासू लागली. शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन 15 एप्रिलपासून उरमोडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. गुरूवारी हे पाणी खटाव तालुक्यात पोहचले.
शेतीसह काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही त्यामुळे काही अंशी मार्गी लागणार आहे. सांगलीकरांनी पाच दिवस उरमोडीचे जादा आवर्तन घेतल्याने आपल्याकडे पाणी थोडे उशीरा सोडण्यात आले. आता दोन्ही तालुक्यांना गरज आहे तितके पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरुन शासनाला सहकार्य करावे.